मुंबई : औरंगाबाद येथे उद्योजकांवर होणाऱ्या हल्ल्यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिले आहे. उद्योगनगरी औरंगाबादेत सातत्याने उद्योजकांवर होत असलेले हल्ले, त्यातून महाराष्ट्राबाहेर जाणारे विपरित चित्र, यामुळे रोजगारांवर येणारी गदा, इत्यादींचा गांभीर्याने विचार करून याबाबत तातडीने पाऊले उचलण्यात यावीत अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच जलदगती न्यायालयात खटले चालवून आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी असेही पत्रात नमूद केले आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, औरंगाबाद येथे सातत्याने उद्योजकांवर हल्ले होत असण्याच्या अनेक घटना अलिकडच्या काळात प्रकाशात आल्या आहेत. दि. ८ ऑगस्ट रोजी भोगले उद्योग समूहाचे प्रबंध संचालक नित्यानंद भोगले, उत्पादन व्यवस्थापक सोनगीरकर, कार्मिक व्यवस्थापक भूषण व्याहाळकर या तिघांना बाहेरून आलेल्या १५ ते २० कथित गुंडांनी मारहाण केली. यासंदर्भातील संपूर्ण फुटेज पोलिसांकडे उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची चिथावणी नसताना ही मारहाण झाली आहे. या प्रकरणातील काही आरोपींना अटक झाली तर काही फरार आहेत.
दि. १० ऑगस्ट रोजी वाळुज एमआयडीसी परिसरात असलेल्या श्री गणेश कोटिंग समूहावर हल्ला करण्यात आला. लेबर कॉन्ट्रॅक्ट आम्हाला द्या, या मागणीसाठी हे लोक गेले होते. या दोन घटनांनंतर आता इतरही अनेक छोट्या उद्योगांच्या समस्या पुढे येत आहेत. पेट्रोल भरून पेट्रोलचे पैसे न देणे, हॉटेलमध्ये जेवल्यावर त्याचे पैसे न देणे, वाहनांची दुरूस्ती केल्यावर त्याचे पैसे न देणे, अशा अनेक तक्रारी पुढे येत आहेत. विशेषत: अलिकडच्या ८-१० महिन्यांत अशा तक्रारी वाढल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अशा प्रकरणात पोलिसांत तक्रारी झाल्यानंतर सामान्य कलमांन्वये कारवाई होते. परिणामी वर्षोनुवर्षे न्यायालयात तक्रारी प्रलंबित राहतात आणि कितीतरी वर्षांनी शिक्षा सुनावली जाते.
अशा घटना सातत्याने घडत राहिल्यास त्याचा राज्यात गुंतवणूक येण्याच्या प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम होतो, शिवाय एक वेगळे चित्र गुंतवणूकदारांच्या मनात उभे राहते. त्यामुळे महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक यावी, यातून मोठ्या संख्येने रोजगारनिर्मिती व्हावी, यासाठी अशा घटनांकडे अतिशय गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. या सर्व घटनांमध्ये कठोरातील कठोर कलमे लावून, हे खटले जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा होत नाही, तोवर या कथित गुंडांवर जरब बसणार नाही. आपण स्वत: यात लक्ष घालून तातडीने कारवाई कराल, ही आशा करतो, असेही देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण’
- ठाकरे टॉप फाईव्हमध्ये! दरेकर म्हणाले, ‘कशाच्या आधारावर सर्व्हे केला? त्यांना काय अधिकार?’
- ‘..तेव्हा तुम्ही तर उकिरडे फुंकत हिंडलात’, संजय राऊत भाजपवर चिडले
- ‘उद्धव ठाकरे लवकरच देशातील पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री ठरणार’, संजय राऊतांचा विश्वास
- लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे टॉप फाईव्हमध्ये!


