🕒 1 min read
सांगली : भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे सक्तवसुली संचलनालय अर्थातच ईडीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर जोरदार चर्चेत आले. ही चर्चा थांबत न थांबते तोवर सांगलीतील भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी ईडीबाबत खळबळजनक वक्तव्य केले आहे. ‘माझ्यामागे कधीच ईडी लागणार नाही. कारण मी भाजप खासदार आहे. हे मी जाहीरपणे बोलतो आहे. हवे तर रेकॉर्ड करुन घ्या’ असे संजय पाटील यांनी म्हटले आहे.
सांगलीच्या विटामध्ये विविध विकास कामाचे उद्घाटन होते. या कार्यक्रमादरम्यान संजयकाका पाटील बोलत होते. या वक्तव्याने राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. स्थानिक नेत्यांनी कर्ज आणि संपत्ती वरून केलेल्या भाष्यवरून बोलताना पाटील म्हणाले, ‘मी भाजपचा खासदार आहे. त्यामुळे माझ्या मागे ईडी लागणार नाही.’ तसंच आम्हाला लोकांसमोर दिखावा करावा लागतो. कर्ज काढून 40 लाखांच्या गाड्या वापराव्या लागतात, असंही संजयकाका पाटील म्हणाले. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, विटामधील राष्ट्रवादीचे नेते वैभव पाटील, बाबासाहेब मुळीक, अशोकराव गायकवाडही उपस्थित होते.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून सत्ताधारी मंत्री व नेत्यांच्या मागे ईडी, सीबीआय व इन्कम टॅक्स अशा केंद्रीय चौकशी यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. रोजच्या रोज छाप्यांच्या व समन्सच्या बातम्या येत आहेत. बहुतेक सर्व कारवाया केवळ महाविकास आघाडीशी संबंधित नेत्यांवर होत आहेत. भाजपशी संबंधित कोणालाही समन्स धाडलं गेल्याचं किंवा त्यांची चौकशी झाल्याचं गेल्या दीड वर्षांत क्वचितच पाहायला मिळालं आहे. सत्ताधारी आघाडीतील तिन्ही पक्ष सातत्यानं हा आरोप करत आहेत. हर्षवर्धन पाटील आणि त्यानंतर संजय पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळं महाविकास आघाडीतील नेत्यांच्या आरोपांना एकप्रकारे बळकटी मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अफगाणिस्तानमधल्या परिस्थितीचे काश्मीरमध्ये परिणाम जाणवतील- बिपिन रावत
- केपी गोसावीच्या सहकाऱ्याच्या आरोपांवर समीर वानखेडेंचे प्रत्युत्तर; म्हणाले…
- कोचिंग क्लासेसनाही लवकरच परवानगी, गृहमंत्री वळसे पाटलांचे आश्वासन
- शेतकऱ्यांना सहज कर्ज मिळावे यासाठी ‘कृषी कर्ज मित्र’ योजना; ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
- ‘अशा ‘राम-द्रोहींनी’ केवळ श्रद्धेलाच हानी पोहोचवली नाही तर…’, योगींचा विरोधकांवर हल्लाबोल


