🕒 1 min read
पुणे: ठाकरे सरकारने सत्तेत असताना औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचे नामांतर अनुक्रमे ‘संभाजीनगर’ आणि ‘धाराशिव’ असे करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला अनेक राजकीय नेत्यांनी पाठिंबा दर्शवला. मात्र ‘एआयएमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयाला आपला विरोध दर्शवला आहे. औरंगाबादचे नामांतर होऊ नये, अशी अनेक औरंगाबादकरांची इच्छा असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. तसेच औरंगाबादचे नामांतर करण्याआधी निवडणूक घ्यावी, लोकांचे मत विचारात घ्यावे असेही ते यावेळी म्हणाले. जलील यांच्या या भूमिकेवर हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी आक्रमक शब्दात टीका केली आहे.
“औरंगाबादच्या नामांतरासाठी निवडणूक घ्यावी, ही इम्तियाज जलील यांची मागणी मूर्खपणाची आहे. औरंगाबादसाठी, निवडणूक घ्यायची असेल तर मग काशी, अयोध्या आणि मथूरासाठीही घ्यायची का?, जेव्हा देशांची फाळणी झाली तेव्हा अशी निवडणूक घेण्याचे जलील यांच्या पूर्वजांनी का नाही सुचवले” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. पुढे ते असेही म्हणाले कि, देशातील इतर शहरांच्या नावांसाठीही मतदान घ्यायचे का?, काश्मीरमध्ये झालेल्या हत्याकांडानंतर अनेकांनी मुस्लिम समाजाचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याचे मत व्यक्त केले होते, मग त्यासाठीही मतदान घ्यायचे का?, असे अनेक प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले. तसेच हिजाब संपवायचा कि नाही यावर आपले मत व्यक्त करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी जलील यांना दिला.
काय म्हणाले होते इम्तियाज जलील
“नामांतराच्या निर्णयामध्ये औरंगाबादकरांचे मत लक्षात घेण्यात आलेले नाही. प्रत्येक शहराची स्वतःची एक ओळख असते. त्यामुळे हा औरंगाबादकरांच्या जिवाभावाचा प्रश्न आहे. केवळ मुस्लिम नागरिकांनीच नव्हे तर इतर धर्मियांनी सुद्धा माझ्याशी संपर्क साधत या निर्णयाचा विरोध केला आहे. त्यामुळे नागरिकांना नामांतर हवे कि नको या मुद्यावर सरकारने निवडणूक घ्यावी त्यात जो निर्णय येईल तो आम्हाला मान्य असेल”, असे जलील म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
