पुणे : सध्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रचार सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. पण यासाठी होत असलेल्या प्रचारसभांना मोठ्या संख्येने गर्दी होत आहे. शासनाचे नियम ओलांडून शासनाचेच प्रतिनिधी बेजबाबदारपणे प्रचार करत आहे. कोरोनाच्या संकटात असे करणे चुकीचे आहे. यामुळे सरकारवर टीका होत आहे. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावरून सारवासारव केली आहे.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांना गर्दीच्या मुद्द्यावरून प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, ’आमच्या हातात सहकारातील निवडणुका पुढे ढकलणं होतं. ते आम्ही केले. आम्हालाही अनेकदा वाटतं की आत्ता निवडणुका लागायला नको होत्या. थोड्या उशिरा किंवा कोरोना कमी झाल्यानंतर झाल्या असत्या तरी चाललं असतं. पण आता पंढरपूर आणि मंगळवेढ्यात काही झालं तर आम्ही जबाबदार असणार आहोत. कारण निवडणूक आयोगाने निवडणुका लावल्या आहेत. आणि आम्ही उमेदवार उभा केला म्हटल्यावर प्रचार तर करणारच आहे. निवडणुका लावल्यावर घरातुन तर प्रचार होऊ शकत नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.
पंढरपूर आणि मंगळवेढा येथील पोटनिवडणुक होत आहे. तिथे राष्ट्रवादी आणि भाजप यांच्याकडून जोरदार प्रचार सुरु आहे. या प्रचारामध्ये भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या तोफा डागल्या जात आहेत. याच दरम्यान भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी हे महाविकास आघाडी सरकार बदलण्याची जबाबदारी माझ्यावर सोडा असे वक्तव्य केले होते. त्याला राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ”महाविकास आघाडी सरकारला बोटाच्या नखाएवढाही धक्का लागणार नाही. हे सरकार स्थिर आहे’ अशा शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनानं कठोर निर्बंध लावले आहेत. नागरिकांकडून त्या निर्बंधांचं पालन केलं जाईल, यासाठी दक्ष राहून काम करा. सार्वजनिक ठिकाणी तसंच अन्य ठिकाणी गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल, याची सर्वांनीच दक्षता घेणं आवश्यक आहे, अशा सूचना देखील अजित पवार यांनी केल्या.
महत्वाच्या बातम्या
- उद्योग क्षेत्राने कामगार कपात टाळावी, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन
- लॉकडाऊनचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणार मोठा परिणाम, उद्योग संस्थांची भीती
- हद्दच झाली! रेमडेसिवीरच्या उपलब्धतेवरून शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवाद
- लेटरवॉर! धनंजय मुंडेंनी आव्हान दिले पंतप्रधानांना लिहा पत्र, पंकजांनी पाठवले मुख्यमंत्र्यांना
- ‘भाऊ, ‘तो’ हक्क फक्त तुम्हालाच आहे!’, पंकजांचा धनंजय मुंडेंवर पलटवार


