पुणे : राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्त करावयाच्या १२ सदस्यांच्या नावांची शिफारस राज्य मंत्रिमंडळानं करून अनेक महिने उलटून गेले आहेत. तरी राज्यपालांनी ही नियुक्ती केलेली नाही. त्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर दोन दिवसांपूर्वी सुनावणी झाली. राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय घेण्यास अवाजवी विलंब लावला आहे, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं.
यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या पक्षांमधून विविध प्रतिक्रिया येत आहेत. राज्यपालांनी कोर्टाचे म्हणणे ऐकून तरी आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न मार्गी लावावा असे मत व्यक्त होत आहे. दरम्यान, याचे पडसाद आता थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर पडत असल्याचे दिसून येत आहे.
त्याचे झाले असे की, पुणे येथे आज सकाळी स्वातंत्र्यदिनानिमत्त विधानभवन येथे ध्वजारोहण कार्यक्रमानंतर राज्यपाल कोश्यारी आणि पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित मान्यवरांच्या भेटीगाठी घेत होते. यावेळी भाजपा खासदार गिरीश बापट यांच्या शेजारी उभे असलेल्या काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांनी हात जोडून थेट राज्यपालांनाच बारा आमदारांची नियुक्ती लवकरात लवकर करा अशी विनंती केली.
यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खांद्यावर हात ठेवत, ‘अजित दादा इथे आहेत, ते माझे मित्र आहेत, ते सरकारमध्ये आहेत…ते मला विचारणा करत नाहीयेत, तुम्ही का विचारणा करताय? असे सुनावले. यानंतर शरद रणपिसे म्हणाले की, सगळं तुमच्यावरच सोडून देतो. यावर राज्यपाल उत्तरादाखल म्हणाले की, मला सुद्धा बारा आमदारांच्या नियुक्तीची काळजी आहे.
पुणे विधानभवन परिसरात घडलेल्या या प्रकारावर अजित पवारांनी केवळ स्मितहास्य केले. दरम्यान, राज्यपालांना आता थेट प्रत्यक्षपणे १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत प्रश्न विचारले जाऊ लागल्याने यावरून राजकीय वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण, न्यायालयाने १२ आमदारांच्या सुनावणीवर हे देखील स्पष्ट केले होते की, कोर्टही त्यांना निर्देश देऊ शकत नाही. राज्यपालांना कोणीच निर्देश देऊ शकत नाही. मात्र, महाविकास आघाडीचे पक्षनेते जाहीर कार्यक्रमात राज्यपालांना प्रश्न विचारत असल्याने सरकारलाच अडचण येण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका’, स्वातंत्र्यदिनी मोदींची मोठी घोषणा
- कोरोना संकटातील भारताची लढाई हा जगभरात चर्चेचा विषय-पंतप्रधान मोदी
- ‘फाळणीने देशाला मोठी जखम, म्हणूनच ‘फाळणी भयस्मृती दिन’ साजरा करणार’
- तिरंगा फडकला! लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या भाषणाला सुरुवात
- ‘अमृत महोत्सवाचे वर्ष नवी ऊर्जा, नवीन चेतना घेऊन येईल’, पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

