🕒 1 min read
मुंबई: महाराष्ट्रासह देशभरात राज्यसभा निवडणुका पार पडल्या. दिल्लीतील सत्ताधारी पक्ष अशा निवडणुका जिंकण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर किती बेमालूमपणे करतो हे यानिमित्ताने पुन्हा दिसले. महाराष्ट्र आणि हरियाणात ते दिसले. राज्यसभा निवडणुकांची मांडवपरतणी सुरू असतानाच त्याच मांडवात विधान परिषदेचे 11 उमेदवार उभे राहिले आहेत. मतांचे गणित हाताशी नसताना भाजपने दोन जास्त उमेदवार उभे करावे याचा अर्थ त्यांना घोडेबाजारात हरभरे टाकायचे आहेत व महाराष्ट्राचे वातावरण बिघडवायचे आहे. राज्यसभा आणि विधान परिषदा मिळून किती कोटींचा धूर निघाला? असा खोचक सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना रोखठोक मधून केला आहे.
महाराष्ट्रात सहापैकी तीन जागा भाजपने जिंकल्या. महाविकास आघाडीने तीन जागा जिंकल्या. सहाव्या जागेवर सहज विजय मिळेल इतके संख्याबळ दोन्ही बाजूला नव्हते. त्यामुळे त्या जागेसाठी काट्याची टक्कर झाली. कोल्हापूरचे धनंजय महाडिक भाजपचे व संजय पवार हे शिवसेनेचे उमेदवारही कोल्हापूरचे. पवार यांना पहिल्या पसंतीची 33 मते मिळाली. महाडिकांना ती 27 मिळाली, पण दुसऱ्या पसंतीच्या मतावर महाडिकांची संख्या 41 वर पोहोचली व पवार 39 वर. महाडिक विजयी झाले हे नक्कीच, पण संपूर्ण महाराष्ट्रात विजयाची रणशिंगे फुंकावीत व महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्याचा ढोल वाजवावा इतके काही घडले नाही. असा टोलाही संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
वसई-विरारच्या ठाकुरांनी त्यांची तीन मते सरळ भाजपच्या पारडय़ात टाकली व अन्य पाच अपक्षांना आपल्याकडे वळविण्यात श्री. फडणवीस यांना यश आले. सहावी जागा व्यापारी व बीओटी तत्त्वावर लढली गेली. दिल्लीत व्यापाऱ्यांचे राज्य आल्यापासून त्यांनी निवडणुका महाग तर केल्याच, पण निवडणुका जिंकण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू झाला. निवडणुका इतक्या महाग झाल्या की सामान्यांना आता निवडणुका लढण्याचा विचारही करता येत नाही. तरीही शिवसेनेने एक सामान्य कार्यकर्ता संजय पवार यास सर्व ताकदीनिशी उमेदवारी दिली व लढवले, धनशक्ती व केंद्रीय यंत्रणांपढे त्यांना हार पत्करावी लागली. असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- बेजबाबदार विधाने करून नुपूर व्हायचे आहे का?; नीलम गोऱ्हेंचा अमृता फडणवीसांना टोला
- “आमचं नशीब चांगलं म्हणून ते…”, छगन भुजबळ यांचे मोठे वक्तव्य
- देशात लोकप्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होते तेच आमदारांमध्ये अप्रिय कसे?; ‘मनसे’चा टोला
- आंद्रे रसेलनं खरेदी केली मर्सिडीज बेंझ एएमजी कार, ‘या’ गाडीची किंमत ऐकून व्हाल थक्क; पाहा VIDEO!
- IND vs SA 2022 : दुसऱ्या टी-२० सामन्याला मुख्यमंत्री नवीन पटनायक घंटी वाजवून करतील सुरुवात; वाचा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
