🕒 1 min read
पुणे : मुंबई-बंगळूर महामार्गावरील नऱ्हे येथील नवले पुलाजवळ गेल्या तीन दिवसांपासून भीषण अपघात होऊन काही नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वारंवार अपघात होऊन आणि पाठपुरावा करूनही वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक सुविधा पुरवल्या जात नाहीत. या ठिकाणी होणाऱ्या अपघातांना भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) व रिलायन्स इन्फ्रा यांचा हलगर्जीपणा जबाबदार असून, त्यांच्यावर या अपघाताप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रस्ते आस्थापना विभागाचे जिल्हाध्यक्ष जगदीश वाल्हेकर यांनी केली आहे.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन वाल्हेकर यांनी रविवारी सिंहगड रोड पोलीस स्टेशनला दिले. पोलीस अधिकाऱ्यांनी हे निवेदन स्वीकारत दोषींकर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी उपजिल्हा अध्यक्ष प्रवीण आग्रे, सुनील कोरपडे, सूर्यकांत कोडीतकर, राहुल वाळुंजकर, आकाश साळुंके, ओंकार पिसाळ, मुथप्पा तारापुरे आदी मनसे सैनिक उपस्थित होते.
जगदीश वाल्हेकर म्हणाले, रिलायन्स आणि एनएचआयए यांच्या हलगर्जीपणामुळेच गेल्या तीन दिवसात नऱ्हे येथील सेल्फी पॉईंटजवळ अपघात होऊन चार जणांचा बळी गेला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. मोठमोठे खड्डे, खचलेला रस्ता, अर्धवट कामे आणि तीव्र उतार यामुळे हा महामार्ग अपघातांचे केंद्र बनला आहे. कात्रज बोगद्यापासून नऱ्हेपर्यंत तीव्र उतार असल्याने रबरी रिफ्लेक्टर लावण्याची गरज आहे. जेणेकरून वाहनचालकांचा वेग कमी होईल आणि अपघात घडणार नाहीत. याबाबत योग्य ती कारवाई झाली नाही, तर रस्त्यावरून उतरून मनसे’ स्टाईल आंदोलन करण्यात येईल.
महत्वाच्या बातम्या
- भारताविरुद्ध पहिल्यांदाच जिंकल्याचा अभिमान : शाहीन आफ्रिदी
- एनसीबीद्वारे केंद्राकडून राज्याला बदनाम करण्याचा डाव; छगन भुजबळांचा मोदी सरकारवर निशाणा
- भुजबळांनी नांदगावच्या जागेचा नाद सोडावा, राऊतांचा सल्ला
- समीर वानखेडेंचा जुना फोटो शेअर करत नवाब मलिक म्हणाले, ‘पहचान कौन?’
- ‘अनिल परब यांनी परिवहन खात्याची वाट लावली’, निलेश राणेंचा घणाघात


