मुंबई : औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांचे नामांतर करण्याची मागणी अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. तसेच या दोन्ही शहरांच्या नामांतरांचा विषय शिवसेनेसाठी राजकीय दृष्ट्या नेहमीच महत्त्वाचा राहिलेला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याच्या एक दिवस अगोदर मंत्रिमंडळाच्या बैठकीत या दोन्ही शहरांचे नामांतर करण्याचा निर्णय घेतला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. या उद्धव ठाकरे सरकारच्या निर्णयाचे पडसाद आजपासून सुरू झालेल्या दोन दिवशीय अधिवेशनात उमटले. आज अधिवेशनाला सुरुवात होण्याअगोदर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. विधानसभा अध्यक्ष म्हणून भाजपचे राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर अभिनंदनपर भाषण करताना समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
“आम्ही मागील सरकारमध्ये महाविकास आघाडीला पाठिंबा दिला मात्र जाता जाता उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलून टाकले. देशाचा महाराष्ट्राचा विकास होत असले तर मला काही आक्षेप नाही. शहरांची नावं बदलून काय संदेश देणार आहात? मुस्लिमांची नावं बदलून काय संदेश दिला जात आहे. बाळासाहेबांच्या नावे मोठी शहरं बनवा, आम्ही टाळ्या वाजवून स्वागत करु. पण मुस्लिमांची नावे बदलून काय म्हणायचे आहे?,” असा सवाल यावेळी अबू आझमी यांनी केला.
अबू आझमींच्या वक्तव्यावर भास्कर जाधव भडकले
या वक्तव्यावर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप घेत प्रत्युत्तर दिले आहे. भास्कर जाधव म्हणाले की, “औरंगजेब अतिरेकी होता, त्याने आमच्यावर अत्याचार केला म्हणून नाव बदलून संभाजी महाराजांचं नाव दिलं आहे. मुस्लिम आणि हिंदू असा भेदभाव नाही इतकंच सांगायचं आहे.”
त्याचबरोबर, औरंगाबाद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याचा प्रस्ताव मागील राज्य सरकारने केलेला आहे. मात्र, यावर केंद्राने अजूनही कोणताही निर्णय घेतलेला नाही. आगामी काळात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांमुळे शिवसेनेसाठी हिंदुत्वाचा मुद्दा महत्त्वाचा होता. याच पार्श्वभूमीवर मागील ठाकरे सरकारने औरंगाबाद व उस्मानाबाद शहरांच्या नामांतराचा प्रस्ताव तयार केला आणि तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरही झाला.
महत्वाच्या बातम्या :


