🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या सदस्या विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्या चव्हाण, त्यांचे पती अभिजित, मुलगा अजित, दुसरा मुलगा आनंद आणि त्यांची पत्नी शीतल यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
डॉ. गौरी यांनी आपल्याला दुसरी मुलगी झाली झाली म्हणून सासरच्या मंडळींनी आपला छळ सुरू केल्याचा गंभीर आरोप या तक्रारीत केला आहे. कौटुंबिक हिंसाचारासोबत विद्या चव्हाण यांच्या दुसऱ्या मुलानं आपला विनयभंग केल्याचा आरोपही त्यांनी या तक्रारीत केला आहे. मात्र दुसऱ्या महिलांवर अन्याय झाल्यावर तत्परतेने पुढे येणाऱ्या आ.विद्या चव्हाण याच सुनेचा छळ करत असल्याचं समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
यावर राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या अध्यक्षा सक्षणा सलगर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘आ. विद्या चव्हाण यांच्यावर झालेले आरोप हे अत्यंत बेछूट आणि निंदनीय आहेत. त्यांच्याविरोधात षड्यंत्र रचले जात आहे. हे षड्यंत्र आम्ही लवकरच उधळून लावू,असेही त्या यावेळी म्हणाल्या. तसेच त्यांनी आतापर्यंत खूप कष्ट केले आहेत. मुंबईतील झोपडपट्टीवासियांसाठी त्यांनी तुरुंगवास सुद्धा भोगला आहे. मात्र त्यांच्याविरोधात असे आरोप होणे हे अत्यंत निंदनीय असल्याच’ त्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, आमदार विद्या चव्हाण यांनीदेखील स्पष्ट शब्दांत हे आरोप फेटाळून लावले आहेत. ‘गेली अनेक वर्षे मी महिलांसाठी काम करते. मुलगा-मुलगी असा भेद आमच्या घरात होणं शक्यच नाही. माझ्या दोन्ही सुनांना मी मुलींसारखंच वागवलंय. त्यामुळं मुलासाठी छळ होतोय हे आरोप निराधार आहेत. गौरीला पहिली मुलगी झाली तेव्हाही आम्हाला आनंद झाला होता आणि दुसऱ्या मुलीच्या जन्माचाही आनंदच आहे,’ असे चव्हाण यांनी एका वृत्त्ववाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.


