🕒 1 min read
मुंबई : भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारताने ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना ५० धावांनी जिंकला. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. भारताच्या युवा खेळाडूंनी या सामन्यात इंग्लंडच्या संघाला पराभवाचे तोंड दाखवले. दीपक हुडा, हार्दिक पंड्या तसेच गोलंदाजीत अर्शदीप सिंग यांनी चमकदार कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला होता. मात्र या सामन्यात इंग्लंडचा संघ मालिकेत पुनारगमन करण्याच्या उद्देशाने उतरेल. तसे पाहिले तर या मैदानावर इंग्लंडची कामगिरीही उत्तम राहिलेली आहे. तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्याची संधी असेल.
टी-२० मालिकेतील आजचा दुसरा सामना त्याच मैदानावर खेळला जाणार आहे, जिथे भारतीय संघाने काही दिवसांपूर्वी कसोटी सामना खेळला आहे. या कसोटी सामन्यात भारतीय संघाला मोठा पराभव पत्करावा लागला होता. इंग्लंडने हा कसोटी सामना सात गडी राखून जिंकला होता. मात्र या कसोटी सामन्यादरम्यान मैदानावर पावसाने अडथळा निर्माण केला होता. त्यामुळे दुसऱ्या टी-२० सामन्यात पाऊस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पावसाची शक्यता कमी
९ जुलै रोजी बर्मिंगहॅमच्या हवामानाबद्दल बोलायचे झाले तर चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण हवामान खात्याच्या मते, या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नगण्य आहे. ९ जुलै रोजी येथील हवामान स्वच्छ राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. तापमानाबाबत बोलायचे झाले तर, किमान तापमान ११ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २३ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून पावसाची शक्यता कमी असल्याचे संकेत आहेत.
खेळपट्टी फलंदाजीस अनुकूल
अलीकडच्या काळात या मैदानावर भरपूर क्रिकेट खेळले गेले आहे. फलंदाजीस अनुकूल मानल्या जाणाऱ्या या खेळपट्टीवर पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने ८ पैकी ५ वेळा सामने जिंकले आहेत. त्यामुळे या सामन्यातील नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. या मैदानावरील सर्वात कमी धावसंख्या ही १०१ आहे तर सर्वोच्च धावसंख्या २२८ आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
