🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रात राजकीय खेळाला कलाटणी मिळताना दिसत आहे. शिंदे गटात फूट पडल्याची बातमी समोर आली आहे. दुसरीकडे, केंद्र सरकारने सर्व बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना सीआरपीएफ सुरक्षा देण्याची घोषणा केली आहे. आता कुटुंबांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. सायंकाळपर्यंत १५ बंडखोर आमदारांच्या घराबाहेर सीआरपीएफ चे (CRPF) जवान तैनात करण्यात येणार आहेत. दरम्यान शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यात चालेल्या वादाविषयी अब्दुल सत्तार यांनी खदखद व्यक्त केली आहे.
“आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहे. पण आम्हाला कधी वेळ मिळत नाही, कधी बोलण्याची संधी मिळत नाही, आमच्या कोणत्याही कामाची चर्चा होत नाही. प्रत्येकवेळी आम्हाला एखाद्या भिकारी सारखे भीख मागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अन्यथा एवढा मोठा उद्रेक कधीही झाला नव्हता”, असे एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी खदखद व्यक्त केली आहे.
कालच्या बैठकीत दीपक केसरकर काय म्हणाले ?
काल (२५ जून) शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) उपस्थिती होते. या कार्यकारिणीत शिवसेनेकडून पाच महत्वाचे ठराव मंजूर करण्यात आले आहेत. या कार्यकारणी बैठकीनंतर बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्वाचे विधान मांडले आहे. केसरकर यांनी यावेळी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतील मंजूर झालेल्या ठरावांवर भाष्य केलं आहे. आम्ही अजूनही शिवसेना पक्षाचेच आहोत. उद्धव ठाकरे अजूनही आमचं ऐकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिंदे हे आमचे नेते म्हणून उद्धवसाहेबांनीच दिलेत. त्यांनी निवडलेल्या नेत्यांविरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत. तसेच आम्ही आमच्या गटाचं नाव हे वेगळं मागितलं नाही. मात्र आमच्याकडे दोन तृतीयांश पेक्षा जास्त संख्या असल्याने आम्हाला हे मान्य नाही. आम्हाला गट स्थापन करू द्यावा, अन्यथा कोर्टात जाऊ, असं देखील ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
