🕒 1 min read
मुंबई : ऑस्ट्रेलियात आगामी काळात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेला फारसा वेळ उरलेला नाही. गतवर्षी ही स्पर्धा भारतीय संघासाठी खूपच वाईट राहिली होती. अशा स्थितीत भारतीय संघ यंदाच्या विश्वचषकात उतरताना कोणतीही कमतरता ठेवणार नाही. मात्र, त्याआधी संघाकडे विश्वचषकाच्या तयारीसाठी मोजकेच सामने शिल्लक राहिले आहेत. अशा परिस्थितीत महत्त्वाच्या स्पर्धेसाठी मजबूत संघ तयार करता यावा, यासाठी व्यवस्थापन अनेक खेळाडूंना संधी देत आहे. या सर्व हालचालींमध्ये अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी या वर्षीच्या विश्वचषक स्पर्धेच्या प्लॅनमध्ये आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने म्हटले आहे की, शमीने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात खेळू नये. मात्र पुढील वर्षी होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी व्यवस्थापनाने शमीचा नक्कीच विचार करावा.
क्रिकबझवर बोलताना नेहरा म्हणाला की, ‘सध्या तो टी-२० विश्वचषकासाठी प्लॅनमध्ये नाही असे दिसते. पण, जर व्यवस्थापनाला शमीची गरज असेल, तर एक गोलंदाज म्हणून त्याची क्षमता आपल्या सर्वांना माहीत आहे. जर त्याला टी-२० विश्वचषकासाठी संधी मिळाली नाही तर मी समजू शकतो. तो कसोटी क्रिकेट खेळत राहील आणि जर तुम्हाला युवा खेळाडूंना संधी द्यायची असेल तर पुढच्या वर्षी होणाऱ्या ५० षटकांच्या विश्वचषकासाठी व्यवस्थापनाने शमीचा नक्कीच विचार करावा.’
शमीला इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत संधी मिळावी
भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. संघाला सुरुवातीला १ ते ५ जुलै दरम्यान एकमेव कसोटी सामना खेळायचा आहे. यानंतर टी-२० आणि एकदिवसीय सामने खेळवले जातील. १२ जुलैपासून एकदिवसीय मालिका सुरू होत असून मोहम्मद शमीला इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात संधी मिळावी. असे आशिष नेहराचे मत आहे. तो म्हणाला की, ‘या वर्षी आमच्याकडे खेळण्यासाठी जास्त एकदिवसीय सामने नाहीत. शमी सध्या आयपीएलनंतर ब्रेकवर आहे. कसोटी सामन्यानंतर भारत त्याला इंग्लंडमधील एकदिवसीय मालिकेत खेळवू शकतो. तुम्ही इंग्लंडसारख्या उच्च दर्जाच्या संघाविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळून तुम्हाला त्या संघाचा पराभव करायला नक्कीच आवडेल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या सर्वोत्तम गोलंदाजांची गरज आहे. त्यामुळे सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीत शमीचा समावेश मी नक्कीच करेन.’
युवा ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या मायदेशात दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील शेवटचा सामना आज बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दोन्ही संघ सध्या मालिकेत २-२ अशा बरोबरीत आहेत. त्यामुळे शेवटचा सामना जो संघ जिंकेल तोच संघ मालिका जिंकण्यात यशस्वी राहील.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
