🕒 1 min read
मुंबई : भाजपाचे विधानपरिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर हे मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सातत्याने टीका करत असल्याचे दिसून येत आहे. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जातीयवादी आणि बहुजन लोकांच्या विरोधी असल्याचा आरोप देखील गोपीचंद पडळकरांनी केला आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकरांवर टीका केली आहे. भाजपामधील वरीष्ठ नेत्यांनी गोपीचंद पडळकरांना आवरायला हवं, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
अहिल्यादेवी होळकर जयंतीवरून आरोप :
अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त रोहित पवार यांनी अहमदनगरच्या चौंडी या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमावरून पडळकरांनी टीका केली होती. आम्ही पहिल्यांदा मागणी करूनही, आमच्या कार्यक्रमाला परवानगी दिली गेली नाही, असे पडळकर म्हणाले होते. यावरूनच आता रोहित पवारांनी निशाणा साधला आहे. “गोपीचंद पडळकर वेगवेगळ्या आंदोलनात व्यस्त होते. त्यामुळे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीसाठी अराजकीय स्वरूपाचा कार्यक्रम घेण्याचा विचार त्यांच्या मनात आलाच नाही”, असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे.
“गोपीचंद पडळकर जेव्हा अहिल्यादेवींच्या नावाचा वापर करतात, तेव्हा ते खालच्या दर्जाचं राजकारण करतात. धनगर समाजाच्या युवक वर्गालाही त्या गोष्टी रुचलेल्या नाहीत. ते चौंडीला अहिल्यादेवी होळकरच्या जयंतीनिमित्त असता, तेव्हा ‘एकछंद गोपीचंद’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. खरंतर त्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने घोषणा व्हायला हव्या होत्या. नगर जिल्ह्याचं नाव बदलण्यासाठी त्यांनी लिहिलेल्या पत्रात फक्त राजकारणच लिहिलंय. खाली एका ओळीत नाव बदलाची इच्छा व्यक्त केली आहे”, असं रोहित पवार म्हणाले.
“मोठे नेते पडळकरांची पाठराखण करतात :
“आपल्या कुटुंबातही जेव्हा लहान मुलं एखाद्या मोठ्या व्यक्तीला चुकून काहीतरी बोलतात, तेव्हा आई-वडील त्याला सांगतात तू गप. तू लहान आहेस. जेव्हा भाजपाचा एक नेता असा सुसाट सुटतो आणि त्यांच्यासोबत इतरही आजी-माजी आमदार असतात, जे खालच्या पातळीवर जाऊन मोठ्या नेत्यांच्या बाबतीत टीका करतात. त्यावेळी त्यांचे मोठे नेते शांत बसतात. टीका करणाऱ्या लोकांना मोठे नेते सहकार्य करतात, त्यांची पाठराखण करतात”, अशा शब्दांत रोहित पवार यांनी टीका केली आहे.
“गोपीचंद पडळकरांचं कर्तृत्व काय हे सांगलीतल्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांच्यावरच्या केसेस बघितल्या तर दिसेल. काही ठराविक त्यांचे कार्यकर्ते सोडले, तर त्यांच्या आरोपांना कुणीही महत्त्व देत नाहीत. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपण्याची जबाबदारी विरोधी पक्षाचीही आहे. त्यामुळे मोठ्या लोकांनी या लोकांना आवरलं पाहिजे”, असं ते यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
