🕒 1 min read
मुंबई : राजस्थान रॉयल्सने २००८ नंतर यंदाच्या हंगामाच्या म्हणजे आयपीएल २०२२ च्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. मात्र, या संघाच्या आशा गुजरात टायटन्सने धुळीस मिळवल्या आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थानचा ७ गडी राखून पराभव झाला. या सामन्यात राजस्थान संघाला १३० धावसंख्या उभारता आली आणि गुजरातने ११ चेंडू बाकी असताना आरामात सामना जिंकला. या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता.
राजस्थानसाठी ट्रेंट बोल्ट आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी चांगली गोलंदाजी केली. पण संघाचे इतर गोलंदाज फारसे प्रभावी ठरले नाहीत. संघाचा वरिष्ठ फिरकीपटू आर अश्विनने अत्यंत खराब गोलंदाजी करत केवळ ३ षटकांत ३२ धावा दिल्या आणि त्याला एकही बळी मिळू शकला नाही. आर अश्विनच्या या खराब गोलंदाजीवर टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने आपले मत मांडले. सेहवाग म्हणाला की आर अश्विनची ऑफ-स्पिन गोलंदाजी फलंदाजांना त्रास देत होती आणि त्याने तीच गोलंदाजी करायला हवी होती, परंतु त्याऐवजी त्याने कॅरम चेंडू टाकला.
सेहवाग पुढे म्हणाला की, पहिल्या डावानंतर खेळपट्टीवर खडबडीत पॅच होता ज्यामुळे शुबमन गिलला त्रास होऊ शकला असता. तसेच हार्दिक पांड्यालाही खेळपट्टीवर टिकणे अवघड झाले आहे असते पण अश्विनची मानसिकता वेगळी होती. तो त्याच्या वेगळ्याच पद्धतीने बळी मिळवण्याचा प्रयत्न करत होता. या मोसमात खेळल्या गेलेल्या १७ सामन्यांमध्ये आर अश्विनने ७.९१ च्या इकॉनॉमी रेटने १२ विकेट घेतल्या. त्याच वेळी, त्याने २७.२९ च्या सरासरीने आणि १४१.४८ च्या स्ट्राइक रेटने १९१ धावा केल्या. अश्विनच्या गोलंदाजीबाबत संघाच्या प्रशिक्षकानेही त्याला गोलंदाजीत सुधारणा करण्याची गरज असल्याचे सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या:

