मुंबई : शेतकरी आंदोलन आणि कृषी कायदे मागे घेण्यासाठी झालेला संघर्ष संपूर्ण देशाने वर्षभर पाहिला. यामध्ये ५०० हून अधिक शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला. मात्र या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधानांची घेतलेली भेट आणि त्यावेळी पंतप्रधानांनी केलेले विधान अधिक गंभीर आहे. जर यात सत्यता असेल तर देशाची जनता मोदींना माफ करणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले.
सत्यपाल मलिक यांनी केलेला हा गौप्यस्फोट अत्यंत गंभीर आहे. शेतकऱ्यांचा मृत्यू आंदोलनामध्ये झाला. केंद्राने तीन कृषी कायदे वेळेत मागे न घेतल्याने, शेतकऱ्यांचे न ऐकल्याने हे आंदोलन वर्षभर सुरू राहीले. त्याबरोबरच लखीमपुर खीरी येथे शेतकरी हत्याकांडही झाले. अशा सर्व घटनांवर पंतप्रधानांकडून अशी असंवेदनशील विधाने येत असतील तर ते योग्य नाही. जर हे सत्य असेल तर देशाची जनता नरेंद्र मोदींना माफ करणार नाही, असे नवाब मलिक म्हणाले.
सत्यपाल मलिक यांनी कोणता दावा केला?
“जेव्हा मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पंतप्रधानांना (Narendra Modi) भेटलो तेव्हा पाच मिनिटांतच माझे त्यांच्याशी भांडण झाले. त्यांना खूप गर्व होता. जेव्हा मी त्यांना सांगितले, आपल्या ५०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तेव्हा त्यांनी माझ्यासाठी मृत्यू झाला आहे का का?, असा प्रतिप्रश्न मला विचारला. मी म्हणालो की, हो तुमच्यासाठीच मृत्यू कारण तुम्ही राजे झाला आहात ना. यावरून माझे त्यांच्याशी भांडण झाले” असा दावा मलिक यांनी केला आहे.