🕒 1 min read
मुंबई: कोरोना आणि दहशत या जणू आता एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. त्याच्या एका तडाख्यातून जगाने थोडा मोकळा श्वास घ्यावा तोच कोरोनाच्या नव्या अवताराचे भूत जगाच्या मानगुटीवर बसते आहे. आता ओमायक्रोन या दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या भुताने जगातील ९१ देशांमध्ये धुमाकूळ घातला आहे. आपल्या देशातही त्याने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव तसेच लसीकरण अशा दोन गोष्टी जगाजवळ नक्कीच आहेत, पण कोरोनाची दहशत संपणार कधी, हा प्रश्न अनुत्तरीतच असल्याचे आजच्या सामना अग्रलेखात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे.
मागील दोन वर्षांपासून संपूर्ण जगावर कोरोना संकटाचे भयंकर सावट पसरले आहे. आधी पहिल्या लाटेचा आणि नंतर दुसऱ्या लाटेचा जीवघेणा तडाखा सगळ्यांनाच बसला. या संकटाचे सावट थोडेफार विरळ झाले, असे वाटत असतानाच कोरोनाच्या ‘ओमायक्रोन’ या नव्या ‘अवतारा’ची दहशत जगभरात पसरू लागली आहे. आपल्या देशातही या नवीन विषाणूने प्रवेश केला आहे. त्याचे प्रमाण तूर्त अत्यल्प असले तरी १५ दिवसांत ओमायक्रोनच्या रुग्णांची संख्या शून्यावरून १५५-२०० पर्यंत गेली आहे. अमेरिका, ब्रिटन आणि इतर युरोपीय देशांमध्ये तर कोरोनाच्या ‘डेल्टा’ आणि ‘ओमायक्रोन’ अशा दोन्ही अवतारांनी धुमाकूळ घातला आहे. ब्रिटनमध्ये ओमायक्रोनची रुग्णसंख्या दिवसाकाठी ८० हजारांवर पोहोचली आहे. अमेरिकेत त्यापेक्षा वेगळी स्थिती नाही. जगातील ९१ देशांमध्ये या नवीन विषाणूने हातपाय पसरले आहेत. ओमायक्रोन हा ‘डेल्टा’ या प्रकारापेक्षा पाचपट संसर्गजन्य आहे, त्यामुळे वेळीच काळजी घ्या, खबरदारीचे उपाय योजा असे इशारे-नगारे जागतिक आरोग्य संघटना १५ दिवसांपासून वाजवीत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
आपल्या देशात मागील १० दिवसांत एक आकडी असलेले हे रुग्ण तीन आकडय़ांत गेले आहेत. रविवारी दिल्लीत सहा महिन्यांनंतर कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. मुंबईतही १७ दिवसांत ओमायक्रोनचे २३ रुग्ण सापडले आहेत. देशाच्या एकूण 13 राज्यांत ओमायक्रोनने शिरकाव केला आहे. त्यामुळे सगळ्यांनीच वेळीच हा धोका ओळखायला हवा. इस्त्रायलसारख्या देशात जगात सर्वात आधी लसीकरण झाले. जून महिन्यात या देशाने स्वतःला ‘कोरोनामुक्त’ घोषित केले. मात्र सध्या तोच देश कोरोनाच्या पाचव्या लाटेच्या तडाख्याला तोंड देत आहे. ही उलथापालथ ‘ओमायक्रोन’ने घडविली आहे हे लक्षात घेतले पाहिजे.असा सावधतेचा इशाराही आजच्या सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादकरांनो अन्यथा; तुमची दुकाने होतील सील…!
- गेल्या 7 वर्षांपासून देवेंद्र फडणवीस…; मलिकांचा गंभीर आरोप
- IPL मेगा लिलावाच्या तारखेबाबत मोठे अपडेट
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात ४९ विषयांसाठी २३१ प्राध्यापकांची निवड; रुजू होण्याचे आदेश
- हेमा मालिनीच्या गालांची तुलना रस्त्याशी करणाऱ्या गुलाबरावांनी अखेर मागितली माफी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
