🕒 1 min read
मुंबई : काही दिवसांपूर्वी गुजरातच्या द्वारकामध्ये मोठी कारवाई करण्यात आली असून तब्बल ३५० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असतांना मलिक म्हणाले की,’मुंद्रानंतर द्वारकामध्ये देखील ३५० कोटींचं ड्रग्ज पकडलं गेलं. हा योगायोग आहे का? मनीष भानुशाली, धवल भानुशाली, किरण गोसावी, सुनील पाटील हे सगळे लोक वारंवार अहमदाबादमध्ये नोवाटेल आणि फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये राहिले आहेत. गुजरातचे मंत्री किरीटसिंह राणा यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. हे सगळे ड्रग्जच्या खेळाचे खेळाडू आहेत. आता असा प्रश्न उभा राहातो की ड्रग्जचा खेळ गुजरातहून तर नाही ना चालत?’ असा सवाल मलिक यांनी केला आहे.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’राज्यातून ३ ग्रॅम, २ ग्रॅमची कारवाई करून, सेलिब्रिटींची परेड करून लोकांचं लक्ष विचलित केलं जावं आणि गुजरातमधून ड्रग्जचा धंदा अविरतपणे चालत राहावा असं नियोजन आहे का ही शंका लोकांच्या मनात उभी राहात आहे. एनआयएकडे मुंद्रा पोर्टचा तपास आहे. द्वारकामध्ये साडेतीनशे कोटींचं ड्रग्ज पकडलं गेलं. आशा आहे की याचा तपास योग्य दिशेने होईल. कोण किती मोठा आहे, किती प्रभावी आहे, कोणत्या पक्षाचा नेता आहे हे न पाहाता एनआयए आणि एनसीबीचे विभागीय संचालक किंवा एनसीबीचे डीजी योग्य पद्धतीने तपास करावा. ड्रग्जची सगळी खेप गुजरातमधून येत असेल, देशात पसरत असेल, तर एनसीबीचे डीजी यावर कारवाई करतील आणि गुन्हेगारांना शिक्षा देण्याचं काम करतील, अशी आशा आहे.’
महत्त्वाच्या बातम्या
- जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही- गोपीचंद पडळकर
- काँग्रेसच्या जितेश अंतापूरकरांनी घेतली आमदारकीची शपथ
- ठाकरे सरकारचा निर्णय, मुंबई महानगरपालिकेत नगरसेवकांची संख्या वाढली
- राष्ट्रवादीचे सहकार पॅनेल जिल्हा बँक निवडणुकीच्या रिंगणात
- आम आदमी पक्ष खऱ्या हिंदुत्वाचे अनुसरण करत आहे; केजरीवालांचा दावा


