🕒 1 min read
पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक १७ एप्रिल रोजी होणार आहे. या निवडणूकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना तर भारतीय जनता पक्षाने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे.
निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर आली असून विविध नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. राज्यमंत्री बच्चू कडू हे देखील भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी पंढरपुरात आले होते. काल त्यांनी मरवडे ता.मंगळवेढा येथील प्रचारसभेत बोलताना भारत भालके यांची आठवण सांगितली आहे.
‘कै.भारतनाना भालके व माझे अतिशय चांगले संबंध होते. मुख्यमंत्र्यांच्या घराला आम्ही घेराव आंदोलन केले होते. त्यावेळी सत्तेत असताना देखील नाना माझ्या मदतीकरिता धावून आले होते. नानांचा तेव्हाचा शब्द आजही आठवतो…. “बच्चूभाऊ मी देखील शेतकरी आहे. शेतकऱ्यांचा विषय असतो तेव्हा पक्ष महत्वाचा नाही, शेतकरी महत्वाचा आहे.” भारतनाना आणि आमचे संबंध असे पक्षापलीकडचे होते. आज त्यांचा मुलगा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवत आहे. ज्याप्रमाणे आपण नानांना प्रेम दिले, त्याचप्रमाणे श्री.भगीरथ भारत भालके यांना आपण साथ द्याल याची मी आशा करतो,’ असं भाष्य बच्चू कडू यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मायच्यान कोणाचाही नाद करा, पण पवार साहेबांचा नाद करु नका – धनंजय मुंडे
- ‘मुख्यमंत्र्यांची आता फक्त कोरोनाशी चर्चा बाकी आहे, त्यानंतर ते लॉकडाऊनचा निर्णय घोषित करतील’
- …म्हणून आशिष शेलार यांनी मानले वर्षा गायकवाड यांचे आभार
- पवारांचा रुग्णालयात गुढीपाडवा; अजितदादांनी घेतली भेट, सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
- उद्धव काका घरी किराणा पाठवणार आहेत का? डीमार्ट बंद झाल्याने तरुणीचा संतप्त सवाल

