🕒 1 min read
मुंबई : आज भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. संपूर्ण देशवासिय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी परंपरेनुसार देशाच्या स्वातंत्र्यदिनी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन तिरंगा ध्वज फडकावला. तब्बल 1 तास 38 मिनिटे त्यांनी देशातील जनतेला संबोधित केलं. तर मंत्रालयाच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील विविध मान्यवरांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधू महाराष्ट्राच्या जनेतेला संबोधन करून शुभेच्छा दिल्या आहेत. आता महारष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून संदेश दिला आहे.
राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट :
एका स्वतंत्र देशाचे नागरिक म्हणून आपण सर्वजण आज ७५व्या वर्षात पदार्पण करत आहोत. मी ‘आपण’ असं म्हणतोय कारण शेवटी देश म्हणजे लोकच- ‘आम्ही भारताचे लोक’! १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हापासून आजपर्यंत आपण अनेक क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक प्रगती केली. पण ही प्रगती सर्वसमावेशक होऊ शकली का? सर्व राज्यांना या प्रगतीचा लाभ मिळाला का? दुर्दैवाने या प्रश्नाचं उत्तर ‘नाही’ आहे.
असंतुलित प्रगती आणि विकासामुळे आज देशापुढे नवीनच प्रश्न उभे राहिले आहेत. महाप्रचंड लोकसंख्या, शेतीपुढील आव्हानांमुळे उद्योग- सेवा क्षेत्रावर रोजगारनिर्मितीचा आलेला ताण, शिक्षण आणि रोजगार संधी यांमधील समन्वयाचा अभाव आणि यातूनच होणारे महाभयंकर स्थलांतर! हे प्रश्न सोडवायचे असतील तर तुकड्या-तुकड्यात विचार करून चालणार नाही. त्यांना समग्रतेने भिडावं लागेल. त्यासाठी सर्वात आधी एक देश म्हणून आपल्याला विचार करावा लागेल.
गेली सात दशकं आपल्या देशात रस्ते, पाणी, वीज याच मूलभूत विषयांवर निवडणूका लढवल्या जात आहेत. आत्ता आत्ता कुठे शिक्षण आणि आरोग्यावर आपल्याकडे चर्चा सुरू झालीये. प्रदूषण, जैवविविधता, पर्यावरण संवर्धन यांमध्ये जागतिक पातळीवर काय चिंतन सुरू आहे, याची आपल्याकडच्या लोकप्रतिनिधींना साधी कल्पनाही नसावी. पण सुदैवाने तरुण पिढी या प्रश्नांबाबत जागरूक आहे. जगातल्या घडामोडींवर बारीक नजर ठेवून असलेली तरुण पिढी आपल्या देशात नेमकं काय ‘मिसिंग’ आहे, हे बरोबर ओळखून आहे. या पिढीला जपायला हवं.
देशात आणि आपल्या राज्यातही सर्वच पातळ्यांवर सुरू असलेल्या द्वेषमूलक प्रचारामुळे या तरुण पिढीच्या स्वप्नांचा बळी जाऊ नये, उलट सामाजिक विद्वेष पसरवणाऱ्या सत्तापिपासूंच्या छाताडावर उभं राहून ‘सत्यमेव जयते’चा नारा बुलंद करण्याचं बळ त्यांच्या अंगी यावं, यासाठी पोषक वातावरण निर्माण करणं, ही काळाची गरज आहे. सात दशकांत जे व्हायचं होतं ते झालं, पण आता यापुढच्या प्रत्येक दशकात काय करायचं ते आपल्या हातात आहे. माझ्या, तुमच्या, आपल्या सर्वांच्या हातात!
स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
महत्त्वाच्या बातम्या
- टी -20 विश्वचषकासाठी ‘या’ दिवशी होणार टीम इंडियाची घोषणा ; ‘या’ खेळाडूंवर असणार नजर
- ‘आजपासून २५ वर्षांनी जे कोणी पंतप्रधान असतील…’
- ‘मला अजितदादाही १२ आमदारांबद्दल बोलत नाहीत, तुम्ही कोण विचारणारे?’ राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला सुनावले
- ‘जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका’, स्वातंत्र्यदिनी मोदींची मोठी घोषणा
- कोरोना संकटातील भारताची लढाई हा जगभरात चर्चेचा विषय-पंतप्रधान मोदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
