मुंबई : मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. वानखेडे कुटुंबानंतर आता नवाब मलिकांनी क्रांती रेडकरच्या कुटुंबावर निशाणा साधलाय. क्रांती रेडकरच्या बहिणीवर पुण्यात ड्रग्जची केस नोंदवलेली आहे, पुण्यात ड्रग्जचं प्रकरण प्रलंबित असल्याचा दावा मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. याप्रकरणी त्यांनी समीर वानखेडेंनी उत्तर देण्याची मागणी केली होती. तर मलिक यांच्या नव्या आरोपांना समीर वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
‘हर्षदा रेडकर यांच्या विरुद्धच्या प्रकरणाचा माझ्याशी काहीही संबंध नाही. ही केस जानेवारी २००८ ची आहे. या प्रकरणानंतर ९ वर्षांनी, म्हणजेच २०१७ साली क्रांती सोबत माझं लग्न झालं. शिवाय, २००८ साली मी एनसीबीच्या सेवेतही नव्हतो. मग त्या प्रकरणाशी माझा संबंध कसा असू शकतो? यात विनाकारण माझं नाव गोवलं जात आहे,’ असं वानखेडे यांनी म्हटलं आहे. तसेच ‘अशा प्रकरणात एका महिलेचे नाव लोकांसमोर प्रसारित करून खूप चांगले काम केलेस मित्रा. खरं तर, आम्ही जेव्हा प्रेस रिलीझ जारी करतो, तेव्हा आम्ही महिलांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी त्यांची नावे देखील शेअर करत नाही’ असंही वानखडे म्हणाले.
‘समीर वानखेडे यांची मेहुणी हर्षदा रेडकर ड्रग्स व्यवसायात गुंतलेली आहे का? पुण्यातील कोर्टात तिच्या नावावरील केस प्रलंबित आहेत. हा घ्या पुरावा,’ असं म्हणत, नवाब मलिक यांनी आज सकाळी एक ट्वीट केलं होतं. त्या ट्वीटसोबत ई कोर्ट सर्व्हिसवरील काही फोटो शेअर केले होते. या प्रकरणाचा समीर वानखेडे यांच्याशी नेमका काय संबंध याचं उत्तर त्यांनी द्यायलाच हवं,’ असं मलिक यांनी म्हटलं होतं.
यावर क्रांती रेडकर हिनेही मलिक यांनी केलेल्या आरोपांवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. या अनुषंगाने क्रांतीने एक ट्विट केले आहे. त्यात ती म्हणते की, ‘डियर मीडिया, मला माहिती आहे की, नवाब मलिक यांच्या ट्विटर हँडलवर केलेल्या एका ट्विटमुळे तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. पण मी हे सांगू इच्छिते की, या प्रकरणात माझी बहीण पीडित होती आणि पीडित आहे. आमच्या लीगल टीमच्या म्हणण्यानुसार हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे यावर प्रतिक्रिया देणे हा समजुतदारपणा ठरणार नाही. माझी बहीण मलिक यांच्या ट्विट विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे. परंतू समीर वानखेडे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाहीये’ असे क्रांतीने स्पष्ट केलेय.
महत्वाच्या बातम्या
- ‘कोविड-१९’मुळे देशाला व राज्याला आरोग्यमंत्री आहेत हे निदान समजले तरी- संजय राऊत
- केंद्र सरकारने समीर वानखेडेचा देखील वापर केला हे येत्या काळात स्पष्ट होणार- नाना पटोले
- ‘परमबीर सिंग यांना बेपत्ता करण्याचं काम मोदी सरकारने केलं’, नाना पटोलेंचा हल्लाबोल
- आग प्रतिबंधक सुविधांसाठी २१७ कोटींची गरज- राजेश टोपे
- ‘अशाने भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा बेकायदेशीर कृत्य करण्याचा आत्मविश्वास वाढतोय’


