🕒 1 min read
अहमदनगर : ६ नोव्हें.रोजी अहमदनगर मधील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागून ११ रुग्णांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार या विभागात कोरोनाबाधित १७ रुग्ण उपचार घेत होते. या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून आरोग्य व्यवस्थेवरून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात राऊत लेखात म्हंटले आहे की,’आज देशातीलच आरोग्य व्यवस्था अतिदक्षता विभागात बेजार होऊन पडल्याचे चित्र आहे. जिल्ह्याजिल्ह्यांत डॉक्टरांची कमतरता आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिकामी आहेत. पंत्राटी पद्धतीने वैद्यकीय सेवा पुरवण्यावर भर आहे. त्या पंत्राटी अधिकाऱ्यांचे मानधनही शासनाने थकवले आहे. ज्या राज्यात डॉक्टर्स, शिक्षक संपावर जातात त्या राज्याची अवस्था बरी नाही असे सर्वसाधारणपणे मानायला हवे. अनेक सरकारी रुग्णालयांत एक्स-रेची व्यवस्था नाही. कान, नाक, घसा, भूलतज्ञ, डॉक्टर्स नाहीत. एखादी शस्त्रक्रिया करायची असेल तर चांगले रुग्णालय नाही. आपल्याकडे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरचा खर्च जेमतेम दोन-तीन टक्क्यांच्या आसपास होतोय. ‘कोविड-१९’च्या महामारीमुळे देशाला व राज्याला आरोग्यमंत्री आहेत हे निदान समजले तरी, नाहीतर मंत्रिमंडळात गृह, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, ऊर्जा याउपर कोणतीच खाती नाहीत असेच चित्र पूर्वी होते. केंद्रातही रेल्वे, पेट्रोलियम, संरक्षण, गृह हीच महत्त्वाची खाती ठरतात व आरोग्य मंत्रालय दुय्यम ठरवले जाते.’
दरम्यान, आरोग्य व्यवस्थेत सरकारला कालपर्यंत कोणताच रस नव्हता. आरोग्य व्यवस्थेचेही संपूर्ण खासगीकरण व्हावे या मताचे आपले सरकार आहे, पण ज्या देशाची बहुसंख्य जनता गरीब व दारिद्रय़रेषेखालील आहे, त्यांना ही भांडवली आरोग्य व्यवस्था परवडणार आहे काय? ग्रामीण आरोग्य व्यवस्था ही असून नसल्यासारखीच आहे. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ असेच ते चित्र आहे. त्यामुळे उपचारांशिवाय तडफडत मरणाऱ्यांच्या अतिदक्षता विभागात होरपळून मरणाऱ्यांच्या किंकाळ्या राजकीय गोंधळात विरून जातात. नगरच्या इस्पितळात आगीच्या दुर्घटनेत ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यासाठी निमित्त शॉर्टसर्किट ठरले असले तरी आरोग्य व्यवस्थेची ही होरपळ आता तरी थांबायला हवी. अर्थात, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांचीही जबाबदारी आहे. सध्या मरण स्वस्त झाले हे मान्य, पण ते इतके अमानुष व क्रूर असावे? सरकारने आता फक्त अश्रू ढाळू नयेत. हे पुनः पुन्हा घडू नये यासाठी काय ठोस पावले उचलणार ते फक्त सांगा, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- केंद्र सरकारने समीर वानखेडेचा देखील वापर केला हे येत्या काळात स्पष्ट होणार- नाना पटोले
- ‘परमबीर सिंग यांना बेपत्ता करण्याचं काम मोदी सरकारने केलं’, नाना पटोलेंचा हल्लाबोल
- आग प्रतिबंधक सुविधांसाठी २१७ कोटींची गरज- राजेश टोपे
- ‘अशाने भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा बेकायदेशीर कृत्य करण्याचा आत्मविश्वास वाढतोय’
- ‘वीरप्पन गँगचा अजून एक कारनामा’, संदीप देशपांडेंनी पोस्ट केला व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
