मुंबई : राज्य सरकारने एकूण १२ नियोजित आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवून कित्येक महिने झाले आहेत. मात्र, अद्याप कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या यादीला मान्यता दिलेली नाही. दरम्यान यावरून महाविकास आघाडीने सातत्याने राज्यपाल व भाजपला यामुळे घेरण्याचा प्रयत्न केला असल्याचे आपल्याला अनेकदा पाहायला मिळाले. दरम्यान, काल आमदारांच्या नियुक्तीच्या वादावरुन मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सचिवांना प्रश्न विचारलाय. ‘राज्य मंत्रिमंडळानं शिफारस केलेल्या १२ सदस्यांबाबत निर्णय कधी घेणार आहात?’ अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाकडून करण्यात आलीय.
शिवसेना खा.संजय राऊत यांनी आज शनिवारी सकाळी माध्यमांशी बोलताना राज्यपालांच्या भूमिकेवर आक्षेप घेतलाय. ‘राज्यपालांनी अशा प्रकारे १२ सदस्यांची नियुक्त न करणं हा घटनेचा भंग आहे. तुम्ही आमचा अपमान करत आहात’, अशा शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली आहे.
‘उच्च न्यायालयाने विचारला तसाच आम्हीही प्रश्न विचारतो आहे. विचारणारे कोण आहेत? लोकनिर्वाचित सरकार, मुख्यमंत्री विचारत आहेत. राज्यपालांनी अशा प्रकारे १२ सदस्यांची नियुक्ती न करणं हा घटनेचा भंग आहे. घटनेनं त्यांना अधिकार दिला आहे. एक वर्ष होऊनही आपले राज्यपाल महोदय त्या फाईलकडे ढुंकून पाहायला तयार नाहीत. हे १२ सदस्य साहित्यिक, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आहेत. तुम्ही आमचा अपमान करत आहात’, असे राऊत म्हणाले.
कोरोना संकटात आमदार कामी आले असते
१२ सदस्य जर वेळेवर नियुक्त झाले असते, तर आज राज्यात जे कोरोनाचं संकट आलं आहे किंवा तौक्ते चक्रीवादळाचं जे संकट आले, त्यात या आमदारांनी काम केले असते. पण राज्यपाल महोदय फार काम करत आहेत. पण आपल्या १२ सदस्यांना नियुक्त करणं हे २ मिनिटांचं काम आहे. तुम्ही किती वेळापर्यंत फाईलवर बसून राहणार, हा प्रश्न जर उच्च न्यायालय विचारत आहे, तर आम्हीही तसा प्रश्न विचारू’, अशी टीका राऊत यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- दहावीच्या परीक्षा रद्द करण्यावरून उच्च न्यायालयाने फटकारलं; मुख्यमंत्री म्हणाले…
- भाषणबाजी नको, म्युकरमायकोसिस विरोधात काय होमवर्क केला ते सांगा ; कॉंग्रेसचा सवाल
- ‘आजच्या 3 तासाच्या वादळाने तर कोकणाची पार धूळधाण केली, किंबहुना…’
- भारतात कोरोनाचा हाहाकार ; ‘या’ राज्याने वाढवला ७ जूनपर्यंत लॉकडाऊन
- ‘आजच्या 3 तासाच्या वादळाने तर कोकणाची पार धूळधाण केली, किंबहुना…’


