🕒 1 min read
मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधत लोकसंख्या धोरण जाहीर केले. देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उत्तर प्रदेश राज्य कायदा आयोगाने (UPSLC) लोकसंख्या नियंत्रण कायद्याचा पहिला मसुदा वेबसाईटवर प्रसिद्ध केला आहे.
यामध्ये परिवार नियोजन करण्यासह अनेक योजना राबाविण्याचा विचार सुरू असून एक मुल झाल्यानंतर नसबंदी केल्यास त्यांना 20 वर्षापर्यंत मोफत आरोग्य सुविधा, शिक्षण, विमा, यासोबत शासकीय नोकरित प्राधान्य असे अनेक लाभ या लोकसंख्या धोरणाच्या माध्यमातून देणार असल्याचे या धोरणात म्हटले आहे. मात्र, यावरून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला लागल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देखील योगींच्या या धोरणावर टीका केली आहे. ‘उत्तरप्रदेशमध्ये योगी सरकार ‘दोन मुलांचे’ धोरण आणत आहे. हे धोरण महाराष्ट्रात 2000 मध्येच तयार करण्यात आलेले आहे. मात्र योगी आदित्यनाथ ‘दोन मुले’ हे धोरण आणून संपूर्ण देशात गोंधळ घालत आहेत. त्यांनी दोन मुलांऐवजी भाजप नेत्यांच्या वक्तव्यानुसार जास्त मुलं जन्माला घालावी हे धोरण आणले पाहिजे,’ असा उपरोधिक टोला नवाब मलिक यांनी यावेळी लगावला.
तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘दोन मुलांच्यावर मुल झालं तर त्या व्यक्तीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा शासकीय लाभ घेता येत नाही हे महाराष्ट्रात धोरण ठरलेले आहे. भाजपमध्ये असे अनेक नेते आहेत त्यांची मुलं नाहीत. किंवा भाजपची मातृसंस्था आरएसएसमध्येसुध्दा असे लोक आहेत ज्यांना मुलंच नाहीत. दोन मुलं ही पॉलिसी बर्याच राज्यात आहे. त्यामुळे योगींनी ‘मुलं नकोत’ ही पॉलिसी अंमलात आणली पाहिजे कारण मुलं नाहीत त्यांना प्रोत्साहन मिळेल.
भाजपचे साक्षी महाराज असतील किंवा त्यांच्यासारखे अनेक लोक आहेत. जे जास्त मुलं जन्माला घाला अशी सारखी सारखी वक्तव्य करत आहेत. त्यांचं ऐकून योगीजींनी पॉलिसी निर्माण करावी,’ असा सल्लाही नवाब मलिक यांनी यावेळी योगींना दिला आहे.
योगींनी घेतलेल्या या निर्णयावर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. यातच आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. लोकसंख्येचा विस्फोट झाला आहे अशा राज्यांमध्ये लोकसंख्येवर आळा घालण्यासाठी कायदा करणं आवश्यक असून गरज असल्यास देशातही अशा प्रकारचा कायदा लागू झाला पाहिजे असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पंकजा तुम्ही जास्त बोलता…’ ; ‘त्या’ बैठकीत मोदींनी घेतली भाजप नेत्यांची शाळा
- ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा’
- यशोमती ठाकूर यांची मध्यस्थी अन् भूमीपुत्रांवरील अन्याय दूर ; 48 तरुणांची वाचवली नोकरी
- खराब रस्त्यांची दुरुस्ती करा आणि त्यानंतर खुशाल सायकल ट्रॅक बनवा, नागरिकांची मनपाकडे मागणी!
- पुणेकरांना किंचित दिलासा : आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
