औरंगाबाद: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ९ जानेवारीपासून औरंगाबाद मधील पर्यटन स्थळे लॉक करण्यात आली होती. मात्र आता हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाने पर्यटन स्थळ अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर शहरात नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. या नव्या नियमावलीनुसार वेरूळ, अजिंठा लेणी, गौताळा यांसह शहरातील सर्व पर्यटनस्थळे खुली राहतील. मात्र यात काही प्रमाणात निर्बंधही लावण्यात आलेले आहेत.
जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेण्या व शहरातील इतर पर्यटन स्थळे बुधवारपासून सुरू करण्यात आलेली आहेत. गेली तीन आठवडेही पर्यटन स्थळे बंद असल्याने पर्यटक व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र आता कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या पर्यटकांना या पर्यटनस्थळी प्रवेश दिला जाणार आहे. मंगळवारी जिल्हा प्रशासनाने याबाबत नियमावली जाहीर केली आहे. तसेच पर्यटकांना पर्यटन स्थळी भेट देण्यापूर्वी ऑनलाईन माध्यमातून तिकीटही विकत घ्यावे लागणार आहे.
दोन्ही डोस मात्र बंधनकारक करण्यात आलेले आहेत. लसीकरण न झालेल्या पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे भारतीय पुरातत्त्व विभागाने सांगितले. नव्या नियमावलीनुसार सर्व उद्याने आणि जंगल सफारी नियमित वेळेनुसार खुली राहतील, पर्यटन स्थळांवर पर्यटकांच्या संख्येबाबत संबंधित विभागाचे नियंत्रक प्राधिकारी निर्णय घेतील. तसेच स्पा, ब्युटी पार्लर, सलून, हेअर कटींग सलून हे सर्व ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. अंत्ययात्रेला उपस्थिती राहणाऱ्या व्यक्तींच्या संख्येवर मर्यादा नसेल. लग्न सोहळ्यासाठी २०० वऱ्हाडी उपस्थित राहू शकतील.
महत्त्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

