मुंबई : पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या स्नुषा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी नरेंद्र मोदी सरकार आणत असलेली तिन्ही विधेयकं शेतकरी विरोधक असल्याचा आरोप करत राजीनामा दिला.
हरसिमरत यांनी ट्विट वरून आपल्या राजीनाम्याची माहिती दिली होती. “मी शेतकरी विरोधी विधेयक आणि कायद्यांचा विरोध करत केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. शेतकऱ्याची मुलगी आणि बहिण म्हणून त्यांच्यासोबत उभी राहिल्याचा मला अभिमान आहे.”
जर सरकारने आज शेतकरी विरोधी विधयेक मांडली तर अकाली दलाच्या केंद्रीय मंत्री आपला राजीनामा देतील, असे सुखबीर बादल लोकसभेत बोलले होते. कदाचित त्याचाच हा पुढचा भाग आहे असे देखील बोलले जातय. तर, महाराष्ट्रात देखील कांदा प्रश्न पेटला आहे.
शेतकऱ्यांना आता कुठे सुगीचे दिवस येत असतानाच केंद्र सरकारने निर्यात बंदी लावली. त्यामुळे कांद्याचा भाव गडगडला असून शेतकऱ्यांचा खर्च देखील निघत नाही. हजारो टन कांदा देशाच्या नेपाळ, भूतानच्या सीमा तर राज्यात मुंबई बंदरात अडकून पडला आहे.हा कांदा सडण्याची भीती व्यक्त केली जात असून शेतकऱ्यांना याचा पैसा तर मिळणार नाहीतच उलट पदरचे पैसे घालून वाहतुकीचा खर्च देखील करावा लागणार आहे. एकूणच देशातील शेतकऱ्यांच्या स्थितीवरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून केंद्र सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे.
सामना अग्रलेख:
केंद्रीय कृषिमंत्र्यांनी घाईघाईने दोन विधेयके आणली व ‘शेतकऱ्यांच्या घरातून आता सोन्याचा धूर निघेल’ अशा थाटात ती संसदेत सादर केली तेव्हा स्फोट झाला. आता देशभरातील शेतकरी संघटना या कायद्यास विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. प्रत्येक राजकीय पक्ष स्वातंत्र्यपूर्व काळापासून शेतकऱ्यांच्याच प्रश्नांवर बोलतो आहे.
शेतकऱ्यांनी सांडलेल्या घामातून आणि त्यागातून अनेक पुढाऱ्यांना खुर्च्या मिळाल्या व राजकीय पक्षांना सत्ता मिळाल्या. पण देशातील शेतकऱ्यांची हालत कधीच सुधारली नाही. श्रीमती हरसिमरत कौर यांच्या राजीनाम्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत केंद्राला जाग आली तर बरेच आहे, नाहीतर सगळ्यांना एकत्र यावेच लागेल.
अकाली दलाच्या केंद्रातील मंत्री हरसिमरत कौर यांनी राजीनामा दिला आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असताना एखाद्या मंत्र्याने राजीनामा दिला तर थोडीफार खळबळ माजणारच. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात दोन विधेयके मंजुरीसाठी आणली. त्यामुळे संतप्त होऊन बाईंनी राजीनामा दिला आहे.
हरसिमरत कौर या मंत्रिमंडळातील अकाली दलाच्या प्रतिनिधी आहेत एवढय़ावरच हा विषय संपत नाही, तर अकाली दलाचे सर्वेसर्वा प्रकाशसिंग बादल यांच्या सूनबाई आहेत. त्यामुळे मोदी सरकारविरोधात बादल कुटुंबाने प्रथमच इतके मोठे पाऊल उचलले आहे. श्रीमती कौर यांचा राजीनामा हा खरोखरच संतप्त आहे की वरवरची धूळफेक, असा प्रश्न होता, पण मोदी यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून शिवसेनेला आधीच बाहेर पडावे लागले. आता अकाली दलाने ठिणगी टाकली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मराठा आरक्षणाला छगन भुजबळांचा विरोध’ ; भेट न दिल्याने आंदोलकांनी व्यक्त केली नाराजी
- ‘ही तर मराठा समाजाच्या डोळ्यात धूळफेक’ ; राज्य सरकारला संभाजीराजेंचा तीव्र इशारा
- मराठा मोर्चा समन्वयकांच्या भेटीबाबतच्या चुकीच्या बातम्या पसरवू नका – छगन भुजबळ
- मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही तोपर्यंत राज्यात कोणतीही भरती प्रक्रिया करू नये
- इंदुमिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यास माझा विरोध : प्रकाश आंबेडकरांचा गौप्य स्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

