नवी दिल्ली : देशामध्ये नुकतेच पाच विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले. तसंच यासोबत पोटनिवडणुकांचेही निकाल जाहीर झाले. यामध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, खराब कामगिरीनंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कागगिरी चांगली करण्याचं सदस्यांना आवाहन केलं आहे. तसंच निवडणुकांच्या निकालांवरून हे स्पष्ट होतंय की काँग्रेसला सुधारणांची गरज आहे, असंही त्या म्हणाल्या. आसाम आणि केरळमध्ये पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत असलेल्या काँग्रेसला पुन्हा पराभवाचा फटका बसला आहे.
‘या निकालाने मी निराश आहे, असं जर मी म्हटलं तर एकप्रकारे वस्तुस्थिती झाकून ठेवल्याचाच तो प्रकार होईल. आपला इतका वाईट पराभव का झाला हे समजून घेतलं पाहिजे. या प्रश्नांतून काही न पटणारे उत्तरे येतील. परंतु त्यातून आपण धडा घेतला पाहिजे. आपण सत्य परिस्थितीला सामोरे गेलो नाही किंवा तथ्यांना योग्य प्रकारे पाहिले नाही तर आपण कधीच धडा घेणार नाही,’ असे यावेळी सोनिया गांधींनी स्पष्ट केले आहे.
‘आपल्याला या गंभीर परिस्थितीची दखल घेण्याची गरज आहे. आपण खुप निराश आहोत हे म्हणणंदेखील कमी ठरेल,’ असं सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या. यावेळी त्यांनी निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी एक टीम तयार करण्याची इच्छा व्यक्त केली. तसंच त्यांच्याकडून त्वरित रिपोर्ट घेण्यात यावा, असंही त्यांनी नमूद केलं. काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या पार पडलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.
काँग्रेस कार्यकारी समितीची आज बैठक पार पडली. या ऑनलाईन बैठकीला संबोधताना सोनिया गांधी यांनी हे आवाहन केलं. आपण 22 जानेवारीला भेटलो होतो. तेव्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक जूनमध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. निडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांनी निवडणुकीचा कार्यक्रम तयार केला आहे. मात्र, कोरोनाचं संकट वाढल्याने पक्षाध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे, असं सोनिया गांधी यांनी यावेळी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- आता ‘या’ मोठ्या शहरात १२ मे पासून पूर्ण लॉकडाऊन !
- ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकरना टोल माफी, केंद्राचा निर्णय
- मराठा समाजाला आरक्षण मिळू नये याची काँग्रेस-राष्ट्रवादीने पायाभरणी केली – घाटगे
- ‘माझ्याकडे नवरा आहे…’; ट्विंकलने युजरला दिले गमतीशीर उत्तर
- ‘मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला नाही, राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा’


