अमरावती – रेल्वे गाडीत बसून डिंक तस्कर पळून गेल्यावर दुचाकीद्वारे मध्यप्रदेशपर्यंत पाठलाग करत आरोपींना सळो की पळो करुन सोडणाऱ्या आणि लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केवळ 28 वर्षीय वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी जबाबदार असलेल्या अपर मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याऐवजी केवळ थातुरमातुर बदलीचे नाटक करणाऱ्या महाविकास आघाडी शासनाचा भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी निषेध केला आहे.
दीपाली चव्हाण यांनी वारंवार रेड्डी यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेतली असती आणि माजोऱ्या DCF शिवकुमारवर रेड्डी यांनी कारवाई केली असती तर दीपाली सारख्या कर्तबगार अधिकारी तरुणीवर जीवन संपवण्याची वेळ आली नसती. दीपालीच्या आत्महत्येने संपूर्ण जनमानस सुन्न असताना राज्य सरकारने रेड्डीवर बदली सारखी सुमार कारवाई करून त्याला क्लीन चिट दिली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वन खाते असताना त्यांनी एखाद्या आरोपीला बदलीच्या माध्यमातून अभय देण्याच्या कृतीचा निषेध शिवराय कुळकर्णी यांनी केला आहे.
शासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या महिलांना लैंगिक अत्याचारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी अस्तित्वात असलेला ‘विशाखा’ कायदा राज्याच्या वनविभागाला लागू होत नाही का, असा प्रश्न शिवताय कुळकर्णी यांनी उपस्थित केला आहे. रात्री बेरात्री शिवकुमार दीपालीला बोलवायचा, अपमान करायचा, वाटेल तसे बोलायचा, सर्वांसमक्ष अपमान करायचा या मागचा त्याचा हेतू स्पष्ट होतो. मग रेड्डी यांनी विशाखा कायद्याचा अंमल करून कारवाई का केली नाही ? रेड्डी नामक वरिष्ठ अधिकारी शिवकुमार विरोधात कुठलेच पाऊल का उचलत नव्हता, या वरून रेड्डी चा शिवकुमारला आशीर्वाद होता, हे स्पष्ट होत असल्याचे शिवराय कुळकर्णी यांनी म्हटले आहे.
दीपालीसह राज्यभर महिलांवर अत्याचार होत असताना राज्य महिला आयोगाला अजून अध्यक्ष नाही. भाजपाने वारंवार मागणी करूनही राज्य महिला आयोगाला अध्यक्ष दिला जात नसल्याची बाब लाजिरवाणी असल्याची टीका शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.दीपालीच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या अपर वनसंरक्षक रेड्डी वर देखील सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- वाईट सुरुवातीनंतरही भारतीय संघ कसा उभारतोय मोठी धावसंख्या
- पांड्याला गोलंदाजी न देण्याचं कारण ऐकून सेहवाग कोहलीवर भडकला
- निष्काळजीपणा भोवणार ; महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर ?
- फुकटात मंत्रिपद मिळालंय, म्हणून आव्हाडांची वळवळ सुरु आहे – राणे
- शेतकऱ्यांची वीज तोडली;भाजपा आमदाराने वीज कंपनीच्या अभियंत्याला दोरीने बांधलं


