मुंबई: खासदार नवनीत राणा यांची भायखळा कारागृहातून ५ मे रोजी सुटका झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा इशारा दिल्याने राणा दाम्पत्यावर कारवाई करण्यात आली होती. यानंतर काल १४ मे रोजी दिल्लीतील कनॉट प्लेस भागातील हनुमान मंदिरात हनुमान चालिसाचे पठण करणार आहोत अशी घोषणा करत नवनीत राणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अजून एक आव्हान दिले आहे.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढण्यास तयार असून, महाराष्ट्रात आता खरा रामभक्त व हनुमानभक्त कोण आहे, याची परीक्षा होण्याची वेळ आली आहे”, अशा शब्दांत खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना खुले आव्हान दिले आहे. महाराष्ट्रात रामभक्त व हनुमानभक्तांवर राजद्रोहाचे गुन्हे दाखल होत आहेत, असा आरोपही नवनीत राणा यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्र सरकारमधील लोकांना सदबुद्धी मिळावी, यासाठी आपण येत्या १४ मे रोजी दिल्लीतील कनॉट प्लेस भागातील हनुमान मंदिरात हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याचे सांगितले.
१४ मे ला महाआरती करणार –
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरुन निवडणूक लढतील काय? हा माझा त्यांना सवाल आहे. मुख्यमंत्र्यांनी १४ तारखेच्या मुंबईच्या सभेत माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. ते जर निवडणूक लढणार असतील तर कोणत्या मतदारसंघातून लढणार, याचंही उत्तर त्यांनी द्यावं. ज्यांनी आपली विचारधारा सोडलेली आहे, अशा उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सभेदिवशी मी दिल्लीत असणार आहे. १४ तारखेला सकाळीच आम्ही दिल्लीतील कॅनोट प्लेसला संकट मोचन हनुमान मंदिरात जाऊन आम्ही आरती करणार आहोत. हे संकट महाराष्ट्रावर आलेलं आहे, ते दूर झालं पाहिजे, अशी मागणी आम्ही हनुमानाचरणी करणार आहोत”, असे नवनीत राणा म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या –


