🕒 1 min read
मुंबई : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून राज्य सरकराने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याकरिता आवश्यक त्या औषधी, वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता राहील, तसेच ग्रामीण भागातही याचा पुरेसा साठा राहील, हे पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. यासंदर्भात टास्क फोर्समधील डॉक्टर्स, वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेतच्या बैठकीत ते बोलत होते. गर्दी वाढली आणि आरोग्याचे नियम पाळले गेले नाहीत, तर दुसऱ्या लाटेतून सावरता सावरता आपण महिना-दोन महिन्यांत तिसऱ्या लाटेलाही सामोरे जाऊ, अशी भीती मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
पहिल्या लाटेच्या वेळेस आपल्याकडे सुविधांची कमी होती, त्यात आपण वाढ करत गेलो. दुसऱ्या लाटेने देखील आपल्याला बरेच काही शिकवले. ही लाट ओसरत असून त्यातील अनुभवातून आपल्याला आवश्यक ती औषधी, आरोग्य सुविधा, बेड्स, ऑक्सिजन उपलब्धता या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करावे लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
लसीकरण वेगाने सुरू होणार
ऑगस्ट-सप्टेंबरपासून देशाला ४२ कोटी लसी मिळणार आहेत, अशी माहिती मिळते आहे. त्यामुळे लसीकरण वेगाने सुरू होऊन महाराष्ट्रालाही त्याचा फायदा होईल. लसीकरण हा या लढाईत महत्त्वाचा भाग असला तरी आरोग्य विषयक नियमांचे पालन करणे, मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे हे अत्यावश्यक आहे. या बैठकीत पुढच्या काळात लागणारी संभाव्य औषधे, त्यांची खरेदी, त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद, आरटीपीसीआर किट, मास्क, पीपीई किट्स अशा बाबींवर विस्तृत चर्चा झाली.
जवळपास १० टक्के मुलांना संसर्ग होण्याचा धोका
पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अतिशय कमी कालवधीत रुग्णसंख्या दुप्पट झाली. नव्या डेल्टा प्लस व्हेरियंटचाही धोका असल्याने तिसरी लाट आल्यास राज्यात रुग्णसंख्या परत दुपट्टीने वाढू शकते. पहिल्या लाटेत १९ लाख रुग्ण होते. दुसऱ्या लाटेत ही संख्या ४० लाखांपेक्षा जास्त झाली होती. सक्रिय रुग्णांची संख्याही ८ लाख होऊ शकते, तसेच १० टक्क्यांच्या आसपास संसर्गग्रस्त मुलांची संख्या असू शकते, असे आरोग्य विभागाने सादरीकरणात सांगितले.
अशी होती रुग्णसंख्या
१७ सप्टेंबर २०२० रोजी पहिल्या लाटेत सर्वाधिक म्हणजे ३ लाख १ हजार ७५२ रुग्ण होते. तर २२ एप्रिल २०२१ मध्ये दुसऱ्या लाटेत सर्वोच्च रुग्ण संख्या ६ लाख ९९ हजार ८५८ होती. १३ सप्टेंबर २०२० रोजी सर्वाधिक ५१७ मृत्यू झाले. तर दुसऱ्या लाटेत २६ एप्रिल २०२१ रोजी सर्वाधिक १११० मृत्यू झाले. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी ९ सप्टेंबर २०२० रोजी सर्वाधिक म्हणजे २३.५३ टक्के होती, तर दुसऱ्या लाटेत ८ एप्रिल २०२१ रोजी २४.९६ टक्के पॉझिटिव्हिटी दर होता. यूके व इतर काही देशांत परत विषाणूचा संसर्ग वाढून निर्बंध कडक करण्याची वेळ येत आहे, याकडेही टास्क फोर्सने लक्ष वेधले.
महत्वाच्या बातम्या
- ‘शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार’, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
- मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा, डीएपी खतांच्या अनुदानात आणखी वाढ
- १५० कोटींच्या सुपरस्पेशालिटीत एकही शस्त्रक्रिया नाही, खा.जलील यांचा खंडपीठात दावा
- उदयनराजेंचा सरकारला अल्टीमेटम, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली तीव्र नाराजी व्यक्त
- ‘पदोन्नती आरक्षणावर महाराष्ट्र ढवळून काढणार’, ऊर्जामंत्री राऊत यांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
