🕒 1 min read
नवी दिल्ली : संसदेत १०२ व्या घटना दुरुस्तीचे विधेयक मांडण्यात आले. राज्य सरकारांना त्यांच्या राज्यातील मागास जातींना आरक्षण देण्याचा अधिकार पुन्हा मिळणार आहे. यामुळे मराठा आरक्षणाबाबत आता समाजाला नवी आशा निर्माण झाली असली तरी विरोधकांनी मात्र या घटना दुरुस्तीचा मराठा आरक्षणाला फायदा होणार नसल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, या विधेयकावर संसदेत चर्चा सुरु असताना शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी ही घटना दुरुस्ती अपुरी असल्याचं म्हटलं आहे. ‘जेवायला वाढताना सोन्याचं ताट कशाला देता? या विधेयकाच्या माध्यमातून तुम्ही चंदनाचा पाट आणि सोन्याचं ताट ठेवलं. पण ताटात काहीच नाही. मीठ नाही आणि लोणचंही नाही. बाकी तर सोडूनच द्या. पंच पक्वान्नही नाहीत. खायचं काय त्या ताटातून?घटना दुरुस्ती करताना तीन वेगवेगळ्या अमेंडमेंट केल्या. त्यातून राज्यांना खूप काही दिलं असं सांगता पण या घटना दुरुस्तीने राज्यांना नेमका कोणता अधिकार दिला?,’ अशा प्रश्नांची सरबत्तीच राऊत यांनी केंद्र सरकारवर केली आहे.
यानंतर भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी संसदेत बोलताना त्यांना चोख प्रत्युत्तर देत शिवसेना भाजपसोबत असताना केंद्र सरकार आणि राज्यातील तत्कालीन फडणवीस सरकारची मराठा आरक्षणासाठी भूमिका योग्य नाही म्हणून आम्ही बाहेर पडतोय असं कोणी म्हटल्याचं मला आठवत नाही, असा टोला लगावला. यासोबतच, त्यांनी महाविकास आघाडी सरकारला देखील लक्ष्य केलं.
‘आज जे विरोधात आहेत आणि भाजपच्या त्यावेळच्या भूमिकेबाबत प्रश्न मांडत आहेत, त्या विरोधकांनी कडाडून विरोध केला किंवा टीका केली असं माझ्या स्मरणात नाही. किंवा आज जे केंद्र सरकारवर ताशेरे ओढत आहेत, की केंद्राने सुप्रीम कोर्टात उगाच दाखल करायचं म्हणून पिटीशन दाखल केलं. मग तुम्ही जेव्हा NDA चा भाग होतात तेव्हा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकारची भूमिका मराठा आरक्षणावर योग्य नाही म्हणून आम्ही बाहेर पडतोय असं कोणी म्हटल्याचं मला आठवत नाही. त्यावेळी हा कळवळा कुठे गेला होता हा प्रश्न मला पडतोय,’ असं प्रीतम मुंडे म्हणाल्या.
यासोबतच, त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह इतर विरोधी खासदारांनी ओबीसी आरक्षणाबाबत भाजप आणि केंद्र सरकारवर केलेल्या आरोपांचा देखील चांगलाच समाचार घेतला. ‘एकूणच हे सिद्ध होतंय की केंद्र सरकारला निश्चितच ओबीसींचा कळवळा आहे. हे केवळ आजच्या एका बिलावरुन सिद्ध होतंय असं नाही, तर ओबीसींच्या कमिशनला घटनात्मक दर्जा देणं असेल, दहा टक्के सवर्णांना आरक्षण असेल, 27 टक्के ओबीसींना मेडिकल ऍडमिशनमध्ये आरक्षण असेल, असे पावलं उचलली आहेत, केवळ भाषणं केलेली नाहीत,’ असा हल्लाबोल मुंडेंनी विरोधकांवर केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सगळं ठाकरे सरकारच झिंगलंय कारण कुटुंब वसुलीत रंगलय’
- ‘MPSC आयोगामध्ये ठराविक एका जातीच्याच लोकांची नियुक्ती’; प्रीतम मुंडे लोकसभेत कडाडल्या
- ठरलं ! 17 ऑगस्टपासून राज्यातील ‘या’ इयत्तेचे वर्ग भरणार
- नांदेड विभागातून तीनशेवी किसान रेल्वे सुसाट; महसूलात कोटींनी वाढ!
- मंत्रिमंडळ “खो खो” आणि अनिल देशमुख सध्या लपाछपी खेळताय, भाजपचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
