बीड : पंकजा मुंडे यांनी पाच वर्षात रेल्वे, रस्ते, राष्ट्रीय महामार्ग आदी जिल्हयाच्या विकासासाठी केलेल्या कामांचा आकडा आणि निधीचा आकडा एवढा मोठा आहे तरीही किरकोळ बाबी तुम्ही तुमची प्रवृत्ती दाखवली आहे. पाच वर्षात पंकजाताईंनी कधीही मागच्या पालकमंत्र्यांना दोष दिला नाही मागच्या सरकारचे वाभाडे काढले नाही स्वतःची दृष्टी आणि प्लॅन समोर ठेऊन काम केलं, याऊलट स्वतःचा कुठलाही अजेंडा न देता पालकमंत्र्यांनी नियोजन समितीची पहिलीच बैठक वाया घातली, त्यामुळे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे विरोधी पक्षातील भूमिकेतून बाहेर या अशा शब्दांत जिल्हा परिषदेचे सदस्य तथा माजी समाजकल्याण सभापती संतोष हंगे यांनी धनंजय मुंडे यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर विकास निधीवरून आरोप केले होते, त्याचे संतोष हंगे जोरदार खंडन केले आहे. पंकजा मुंडे यांनी जिल्हयात केलेले काम तुम्हाला डोंगर दऱ्यात फिरताना, हाय-वे वर फिरताना ,विम्याचे पैसे घेताना दिसले. तुम्हाला विकासाचं अंधत्व आहे . कोणताही आराखडा मान्य केल्यावर त्याचे सर्व पैसे रिलीज होत नसतात ते टप्प्यानेच दिले जातात हे तुम्हाला माहीत नसेल.
रेल्वे, रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, जलयुक्त शिवार, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इमारती, तीर्थक्षेत्र विकास तसेच इतर योजनांचा निधी मंजूर झाला तरी तो टप्प्या टप्प्यानेच आला आणि त्यातून कामे झाली. निवडणूक आचारसंहिता आणि प्रशासकीय यंत्रणेतील गतीचा परिणाम कामावर झाला, असे असताना धनंजय मुंडे यांनी स्वतःचा कुठलाही अजेंडा न देता पहिली बैठक वाया घातली, मागे वळून पाहण्याची त्यांची सवय गेली नाही असे हंगे म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

