बीड: औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेच्या अवैध वाहतूकीसंदर्भात पुन्हा एकदा गावकऱ्यांचा रोष दिसून आला असून तालुक्यातील मलकापूर येथील गावकऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी ४० ते ५० हायवा ट्रक अडवून ठेवल्या आहेत. राखेच्या अवैध वाहतूक थांबावी यासाठी नागरिक त्रस्त असताना प्रशासन मात्र झोपेत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे कोळशावर चालणारे २५० मेगावॅटचे तीन विद्युत निर्मिती केंद्र असून या तीन संचातून ७५० मेगावॅट विद्युत निर्मिती केली जाते. या विद्युत निर्मिती संचातून मोठ्या प्रमाणावर राख बाहेर पडते. यातील काही राख बंद गाड्यातून सिमेंट फॅक्टरीसाठी पाठवली जाते. हायवा ट्रकमधून विटभट्ट्यांसाठी अवैधरित्या, उघडी वाहतूक केली जाते त्यामुळे रस्त्यावर गतिरोधकाजवळ, रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर सांडली जाते.
पडलेली राख सुसाट वेगाने जाणाऱ्या गाड्यामुळे हवेत पसरते व मोठ्या प्रमाणावर हवेने उडते. यामुळे रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो. गुरुवारी सायंकाळी मलकापूर येथे अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकमधून राख पडल्याने गावातील एक दुचाकीस्वार जखमी झाला. गावकऱ्यांचा संताप अनावर झाल्याने गावकऱ्यांनी एकत्र येऊन या मार्गावरून वाहतूक करणारे जवळपास ४० ते ५० हायवा ट्रक अडवून ठेवले आहेत.
मागच्याच आठवड्यात पांगरी येथे महिलांनी अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून राख पडून हवेचे प्रदूषण होत असल्याने १०० हायवा अडवून या महिलांनी हायवा टिप्परच्या ड्रायव्हरला पडलेली राख साफसफाई करण्यास भाग पाडले होते. एवढे सर्व नागरिक त्रस्त असताना औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचे व स्थानिक प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेत असल्याने सातत्याने नागरीकांचा राग अनावर होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाविकास आघाडीत छोट्या घटक पक्षांची होतेय फरफट ?
- ‘पदोन्नती आरक्षण प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने सरकारला निर्णय घेणे अशक्य’
- ‘ओबीसी समाजाचे नेते आरक्षणासाठी एकत्र येतात मग मराठा समाजाचे नेते का येत नाहीत?’
- ‘या’ गोष्टीशिवाय संजय राऊतांना जेवणच पचत नाही; देवेंद्र फडणवीस यांचा टोला
- पायी वारीचा मुद्दा चिघळला; बंडातात्या कराडकर यांना दिसता क्षणीच अटक करण्याचे आदेश


