कोल्हापूर : २१ जुलै पासून सलग तीन दिवस कोल्हापूरसह सांगली, साताऱ्यामध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले होते. या जिल्ह्यांमध्ह्ये झालेल्या रेकॉर्डब्रेक पावसामुळे २०१९ पेक्षाही अधिक गंभीर स्थिती निर्माण झाली होती. कोल्हापूरमध्ये शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश भाग हा पुराच्या पाण्याखाली गेला होता. यामुळे हजारो कुटुंबाना फटका बसला असून घरासह व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे.
२०१९ सालच्या महापुरांनातर सलग दोन वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यातच पुन्हा पूर यामुळे व्यापाऱ्यांसह अनेक कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात घरदार उध्वस्त झाल्यामुळे पुन्हा उभं राहण्यासाठी या कुटुंबांना आणि व्यावसायिकांना मदतीच्या हाताची गरज आहे. पूर ओसरल्यापासून अनेक नेत्यांच्या दौऱ्याची सुरुवात झाली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कालपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
काल शिरोळ तालुक्यात पूरग्रस्त भागासची पाहणी घेऊन गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर फडणवीसांनी आज कोल्हापूर जिल्ह्यासह पुराचा मोठा फटका बसणाऱ्या प्रयाग चिखली गावाला देखील भेट दिली. यावेळी एका ग्रामस्थाचा संताप झालेला पाहायला मिळाला.
यावर तुम्हाला मदत मिळवून देईन असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर ग्रामस्थ म्हणाला, ‘साहेब मागच्यावेळी(२०१९ महापुराच्या वेळी) चंद्रकांतदादा आलेले. त्यांनी सुद्धा शब्द दिला होता, नाही म्हणत नाही. याच मंदिरात दादांनी शब्द दिला होता मारुती साक्ष आहे. त्याच्यानंतर दोन वर्ष कुठं गेलं प्रशासन ? तुम्ही बघितलं नाही. आदित्य ठाकरे साहेबांनी बघितलं नाही. कुणीच बघितलं नाही आमच्याकडं. २ वर्षे झाली आणि आज तुम्ही आलाय इथं. तुम्ही आश्वासन देणार आणि नंतर तुम्ही तुमच्या कामाला लागणार, आम्ही आमच्या कामाला लागणार. परत आमच्याकडं कोणी बघत नाही साहेब, हे मी उघड सांगतोय,’ अशा शब्दांत रोष व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या
- कोणतेही कागद न मागता आम्ही मदत केली, अजून तरी या सरकारने कोणती मदत केली नाही- फडणवीस
- मंत्रिमंडळ बैठकीतच अस्वस्थ वाटू लागल्याने मंत्री जयंत पाटील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
- ‘मी फक्त पॅकजची घोषणा करणारा नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री’
- मी येतोय, भेटण्यासाठी थांबा… मुख्यमंत्र्यांनी दिला होता निरोप; प्रविण दरेकर यांचा दावा
- फडणवीसांच्या भेटीवर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘ही भेट बंद दाराआड नाही; पुरामुळे दरवाजेच शिल्लक नव्हते’


