🕒 1 min read
औरंगाबाद: राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांची रिक्त पदे तातडीने भरली जातील असे राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज (दि.२८) विधान परिषदेत सांगितले. यासंदर्भात मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण(Satish Chavan) यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. राज्यातील परभणी, राहुरी, अकोला व दापोली या कृषी विद्यापीठातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत.
४८ टक्के तर एकट्या परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात जवळपास ५४ टक्के जागा रिक्त असून याचा थेट परिणाम या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांवर होत असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. १२ ऑगस्ट २०२१ च्या शासन निर्णयानुसार कृषी विद्यापीठातील शिक्षकवर्गीय अधिकारी/कर्मचार्यांच्या शैक्षणिक पात्रतेत बदल करण्यात आले आहेत. त्यांच्या या शैक्षणिक पात्रतेत केलेले बदल लागू करण्यासाठी महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परिनियम १९९९ मध्ये सुधारणा केल्यानंतरच शिक्षकवर्गीय अधिकारी/कर्मचार्यांच्या पदोन्नतीचा मार्ग सुकर होणार आहे.
त्यामुळे या परिनियमामध्ये सुधारणा कधी करणार?, जोपर्यंत या परिनियमामध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत पदोन्नती जुन्या परिनियमांप्रमाणे करणार का? असे प्रश्न आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहात उपस्थित केले. कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी उत्तर देतांना कृषी विद्यापीठाची भरती प्रक्रिया त्वरित सुरू केली जाईल, सध्याच्या कृषी विद्यापीठ परिनियमांच्या आधीन राहून शिक्षकवर्गीय अधिकारी/कर्मचार्यांची पदोन्नती करण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी जी रिक्त पदे आहेत ती तासिका तत्वावर अथवा योग्य त्या मानधनावर तातडीने भरण्यात येतील असे सभागृहात सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- गुंडांनी भगवी वस्त्र धारण केल्यास त्यांना संत म्हणता येणार नाही; छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची टीका
- दक्षिण आफ्रिकेतील वनडे कर्णधारपदी केएल राहुलची होणार निवड?
- …तर राज्य सरकारने दोन दोन हात करण्याची हिंमत दाखवावी- भास्कर जाधव
- ‘मविआ’ने अल्टीमेटम देताच राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना बंद लिफाफ्यात पत्र
- “केएल राहुल सध्या जागतिक क्रिकेटमधील अष्टपैलू फलंदाज”


