मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार उद्धव ठाकरेंपासून वेगळे होऊन भाजपासोबत सरकार स्थापन करू शकतात. याबाबत अंतर्गत चर्चा सुरू आहे. सध्या शिंदे गट आणि भाजप दोन्ही पक्ष कोणत्या अटींवर सहमत आहेत. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव समोर येत आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केले आहे.
पोस्टमध्ये उद्धव ठाकरे पोस्टमध्ये म्हणाले कि, आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे, आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत, आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो, कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा, यातून निश्चित मार्ग निघेल, आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका, शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही, समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू. आपला नम्र, उद्धव बाळासाहेब ठाकरे… अशी पोस्ट उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या आवाहनानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या कि, मुख्यमंत्री असावा तर, उद्धव ठाकरेंसारखा म्हणत आज आपल्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येत असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. बाळासाहेबांनी माझ्यावर लहानपणापासून प्रेम केल्याचं त्या म्हणाल्या. सुळे म्हणाल्या की, माँ नी त्यांच्यातील असलेली संवेदनशीलता उद्धवजींच्या सगळ्या कृती आणि वागण्याबोलण्यातून दिसते. त्यामुळे बाळासाहेबांनी ते स्वतः हयात असताना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरेंना दिली. शिवसेनेची ही खूप मोठी जबाबदारी होती असेही त्या म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या :


