🕒 1 min read
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या सदस्या विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्या चव्हाण, त्यांचे पती अभिजित, मुलगा अजित, दुसरा मुलगा आनंद आणि त्यांची पत्नी शीतल यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
डॉ. गौरी यांनी आपल्याला दुसरी मुलगी झाली झाली म्हणून सासरच्या मंडळींनी आपला छळ सुरू केल्याचा गंभीर आरोप या तक्रारीत केला आहे. कौटुंबिक हिंसाचारासोबत विद्या चव्हाण यांच्या दुसऱ्या मुलानं आपला विनयभंग केल्याचा आरोपही त्यांनी या तक्रारीत केला आहे.
दरम्यान, यावर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आ. विद्या चव्हाण असं करणारच नाहीत, असा विश्वास व्यक्त केला आहे, ”विद्याताई चव्हाण गेले तीस वर्ष झाले समाजासाठी काम करीत आहेत, महिलांवरील अत्याचाराच्या संदर्भात आणि स्त्री भ्रूण हत्येसंदर्भात सुद्धा त्या सतत आवाज उठवत असतात त्यामुळे त्या अशा पद्धतीने सुनेबरोबर वागतील यावर आमचा विश्वास बसत नाही. कारण मी त्यांना जवळून ओळखते. त्या असं कधी करणार नाहीत, त्यांना न्यायालयातून नक्कीच योग्य न्याय मिळेल, आणि खरी बाजू जनतेसमोर येईल” अशी प्रतिक्रिया तृप्ती देसाई यांनी मांडली आहे.
तसेच, या सर्व प्रकारावर राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली चाकणकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘विद्या चव्हाण यांच्या मुलाच्या लग्नाला दहा वर्षे झाली आहेत. चव्हाण यांचे कुटुंब सुशिक्षित आहे. ते असे काही करणार नाहीत. केवळ राजकीय प्रतिमा खराब करण्यासाठी हे सर्व केलं जात आहे. तसेच त्यांची ही केस सध्या कौटुंबिक न्यायालयात सुरु आहे, जे सत्य असेल ते लवकरच समोर येईल,’ असे मत रुपाली चाकणकर यांनी मांडले आहे.
त्याचप्रमाणे, आ.विद्या चव्हाण यांनीही सुनेने केलेले आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहेत. ‘गेली अनेक वर्षे मी महिलांसाठी काम करते. मुलगा-मुलगी असा भेद आमच्या घरात होणं शक्यच नाही. माझ्या दोन्ही सुनांना मी मुलींसारखंच वागवलंय. त्यामुळं मुलासाठी छळ होतोय हे आरोप निराधार आहेत. गौरीला पहिली मुलगी झाली तेव्हाही आम्हाला आनंद झाला होता आणि दुसऱ्या मुलीच्या जन्माचाही आनंदच आहे,’ असे चव्हाण म्हणाल्या.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

