मुंबई : आज मुंबईतील बेकेसीमध्ये मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी विविध मुद्द्यांवरुन सत्ताधारी शिवसेनेला व ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. त्यामुळं आजची सभा वादळी ठरणार असल्याचे अंदाज बांधले जात आहेत. संजय राऊत यांनी ‘मुख्यमंत्र्यांची आजची सभा ही आतापर्यंच्या शंभर सभांचा बाप आहे’ असे वक्तव्य केले आहे.
“आजची मुंबईतली सभा ही आतापर्यंत झालेल्या शंभर सभांचा बाप आहे. मैदानात उतरण्याच्या निश्चयाने, जिद्दीने या सभेचे आयोजन केलं आहे. महाराष्ट्राचा देशाचा राजकीय वातावरण आणि या वातावरणावरती आलेलं मळभ, दुःख, गढूळपणा हा आजच्या सभेने दूर होईल. महाराष्ट्राचा आकाश निरभ्र होईल आणि या आकाशात भगवा धनुष्य दिसेल. पोटदुखी, जळजळ असणाऱ्यांवर आजच्या सभेत योग्य उपचार केले जातील”, असा टोलाच संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे.
तसेच आम्हाला गर्दी जमवावी लागत नाही, आम्हाला गर्दी आणावी लागत नाही. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळेल अशा प्रकारची ही सभा असणार आहे. हे राज्य, हा पक्ष हा पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानेच आणि बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेरणेने चाललेला आहे. काही लोक हे राज्य बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक प्रश्न निर्माण केलेत, काही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पोटदुखी, लोकांची जळजळ यावर मला असं वाटतं आजच्या सभेत योग्य उपचार होतील, असेही संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –


