औरंगाबाद : कोरोना संसर्गाचा दुसऱ्या लाटेत लस घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. अनेक केंद्रावरील गर्दीत भांडणे देखील झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र दुसरी लाट ओसरताच आता लसीकरण केंद्रे ओस पडताना दिसून येत आहेत. सध्या ४५ वर्षांवरील नागरिक लस घेण्यासाठी फिरकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे बाजारपेठ व मुख्य रस्त्यावर मनपाच्या नागरिक मित्र पथकाकडून नागरिकांनी लस घेतली किंवा नाही याची तपासणी केली जाईल. लस न घेता जर कोणी रस्त्यावर फिरत असेल तर त्यांना दंड केला जाईल, असे डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.
कोरोना संसर्गाची दुसरी लाट कमी करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार महापालिकेने शहरातील ११५ वाॅर्डात लसीकरण केंद्र सुरू केले. जम्बो लसीकरण मोहिम औरंगाबाद पालिकेने सुरू केली. सुरुवातीस महापालिकेला लसीही मोठ्या प्रमाणात मिळाल्या. त्यामुळे एका दिवसात सरासरी दहा ते अकरा हजार जणांचे लसीकरण सुरू होते. लसीकरण केंद्रावर पहाटेपासूनच रांगा लागत होत्या.
दरम्यान १ जून पासून १८ ते ४४ वयोगटासाठी राज्य शासनाने लसीकरण सुरू केले व त्यानंतर केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीच्या दोन डोस मधील अंतर ८४ दिवसांनी वाढवले. त्यामुळे आता लसीकरण केंद्रावर पहिला तसेच दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर रोजी रोडावली आहे. ४५ वर्षांवरील सुमारे तीन लाख नागरिकांनी आत्तापर्यंत लस घेतलेली नाही. पालिकेच्या माध्यमातून शहरात आजवर ३ लाख ११ हजार ४६६ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
या संदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना पाडळकर यांनी सांगितले की, शहरात ४५ वर्षावरील सुमारे साडेचार ते पाच लाख नागरिक आहेत. त्यापैकी पावणे दोन लाखांपेक्षा कमी नागरिकांनी लस घेतली आहे. उर्वरीत ३ लाख नागरिक लसीकरणापासून अद्यापही दूर आहेत. ४५ वर्षावरील वयोगटातील नागरिकांनी लस घेतलीतर कोरोना संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे. त्यामुळे मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी कोरोनाला रोखण्यासाठी लस न घेता रस्त्यावर फिरणार्या व्यक्तींना दंड लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शिक्षकांच्या ऑनलाईन आंदोलनाला यश! ‘या’ शिक्षकांचा पगार सीएमपी प्रणालीद्वारे होणार
- आता आपल्याला ‘लॉकडाऊन’ आणि ‘नॉकडाऊन’ दोन्हीही नको – उद्धव ठाकरे
- कोरोनाची तिसरी लाट, बालकांसाठी मेल्ट्रॉनच्या कोविड सेंटरमध्ये ५० तर एमजीएममध्ये १०० बेड्स!
- ‘पवारांना निवडणुकीचे डोहाळे लागलेत, ते तिघे एकत्र आले तरी भाजपच जिंकणार’
- ३० वर्षात शासकीय सुविधेपासून वंचित असलेल्या ‘या’ गावाला मिळणार दिलासा


