🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ च्या बाहेर नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसाचं पठण करण्याची घोषणा केली होती. आता ही भूमिका बदलली आहे. आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठण करण्याचा हट्ट सोडला आहे. त्यानंतर लगेच शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन राणा दाम्पत्यावर हल्ला चढवला आहे.
संजय राऊत म्हणाले, “मातोश्रीवर घुसून काही वेगळं कारस्थान रचण्याचं यांचं कारस्थान होतं. हनुमान चालिसा आपल्या घरात वाचता येते. मंदिरात वाचता येते, त्यासाठी मातोश्रीवर येण्याची गरज काय होती? श्रीरामाचं नाव घेण्यासाठी या बबलीचा विरोध होता. आता मोठं हिंदुत्वावर बोलताय. शिवसेनेचं हिंदुत्व घंटाधारी नाहीये. आमचं हिंदुत्व गदाधारी आहे. आम्हाला हिंदुत्व शिकवण्याचा अतिशाहणपणा करु नका. शिवसेनेच्या नादाला लागू नका. नाहीतर २० फूट खाली गाडले जाल. हे कॅमेराच्या समोर सांगतोय. तुमच्या विषाला उकळी फुटली असेल तर त्याला रोकण्याची ताकद आमच्यामध्ये आहे”.
“गेल्या दोन दिवसांपासून घंटाधारी बोगस हिंदुत्ववादी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत होते. मुंबईत येऊन मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा वाचू, अशी भाषा त्यांनी वापरली. अमरावतीच्या बंटी बबलीने गोंधळाचा प्रयत्न केला. पंतप्रधानांच्या दौऱ्याचं कारण सांगून त्यांनी पळ काढला, शेपूट घातलं. पंतप्रधानांच्या दौऱ्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे, ते आमचेही पंतप्रधान आहेत. पंतप्रधानाच्या दौऱ्याचं रक्षण करण्यासाठी शिवसैनिक ठामपणे उभा राहिल. त्यामुळे बंटी बबलीचा दावा साफ चुकीचा आहे”. असेही संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
