मुंबई : कोरोना महामारीने मागील वर्षीपासून जगभरात थैमान घातले आहे. बऱ्याच देशांमधील कोरोना महामारी आटोक्यात येत असली तरी भारतात मात्र अजूनही संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका हा कायम आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला होता. यामुळे आता निर्बंधांमध्ये सूट देताना राज्य सरकार व प्रशासन हे गंभीरतेने विचार करूनच निर्णय घेत आहेत.
यंदा देखील कोरोनाचे सावट कायम असल्याने सर्व धर्मियांनी सण-उत्सव साधेपणाने साजरे करावे असे आवाहन केले जात आहे. गेल्यावर्षी प्रमाणेच यंदा देखील गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा असं आवाहन करण्यात आलं असून राज्य सरकारने याबाबत नियमावली देखील जाहीर केली आहे. दरम्यान, गणेशोत्सव काळात नियमांमध्ये सूट द्यावी तसेच मंदिरे खुली करावीत अशी मागणी भाजपकडून केली जात आहे.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून राज्यातील उत्साह वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सतर्कतेचे आवाहन केले आहे. ‘हे उघडा ते उघडा या मागण्या ठीक आहेत, पण त्यातून धोका वाढला आहे. प्रत्येकाने नियम आणि मर्यादा पाळल्या तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही. म्हणूनच माझ्या शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांना मी विनम्र आवाहन करीत आहे, आपण सगळ्यांनीच शहाणपणाने वागून लोकांच्या जिवाचे रक्षण करायला हवे,’ असं ठाकरे यांनी म्हटलंय.
पुढे ते म्हणाले, ‘ सण, उत्सव आज झाले नाहीत तर उद्या नक्की येतील, पण घरातला प्रत्येक माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. लोकांच्या जिवावरील विघ्न टाळायचे असेल तर, शासनाने वेळोवेळी आखून दिलेल्या आरोग्याच्या नियमांचे पालन होईल हे काटेकोरपणे पहा, गर्दी करू नका. सार्वजनिक कार्यक्रम टाळा. राजकीय सभा, संमेलनांना उत्तेजन देऊ नका, हीच त्या विघ्नहर्त्या श्री गणेशाची इच्छा असेल.’
महत्त्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांना ईडीने लूक आऊट नोटीस बजावल्यानंतर फडणवीसांनी दिला ‘हा’ सल्ला
- …म्हणून संजय राऊत यांच्या विरोधात पुण्यात भाजपने दाखल केली तक्रार
- ‘सत्तेत आल्यावर महिलासबलीकरणाची व्याख्या बदलते का?’; चित्रा वाघ यांचा सुळेंना खोचक सवाल
- ‘संजय राऊत हळूहळू खरं बोलायला लागलेत’; आशिष शेलार यांचा खोचक टोला
- ‘..मग शिवाजी महाराजांना अटक केली असती का?’


