टीम महाराष्ट्र देशा : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्ष चांगलेच सक्रीय झालेले आहेत. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. या पक्षांतरामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यातही राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.
वर्धा जिल्ह्याचे नेते आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित दोन दिवसात समीर देशमुख यांचा मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश होणार आहे. समीर देशमुख हे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव आहेत. सुरेश देशमुख हे शरद पवारांचे खांदे समर्थक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का आहे.
याआधीही शरद पवारांना मोठे धक्के बसले आहेत. त्यात राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सोबत असणारे मधुकर पिचड यांनीही पवारांची साथ सोडली आहे. तसेच उस्मानाबादचे नेते राणा जगजितसिंह पाटील यांनीही पक्षांतर करत राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. आणि आता सुरेश देशमुख यांचे चिरंजीवही शिवसेनेत प्रवेश करत असल्याने शरद पवार यांना हा मोठा धक्का आहे.
दरम्यान, आतापर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील चित्रा वाघ , सचिन आहिर, धनंजय महाडिक, वैभव पिचड, याच्या सह अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देवून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच रश्मी बागल आणि दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

