🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर येथे घेण्यात आली. यावेळी शरद पवार यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सक्रीय सहभाग नोंदवण्याची ग्वाही दिली. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी माजी मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या कामाची स्तुती केली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “पक्षाचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केलेल्या कामाची दखल संपूर्ण देशाने घेतली. नवाब मलिक यांनी केंद्र सरकारची केलेली पोलखोल अतिशय उल्लेखनीय होती. त्यांचा आवाज दाबण्यासाठी केंद्राने त्यांना निष्कारण त्रास देण्याचा डाव आखला आहे. आपण विरोधात असतो तेव्हा काम सोपे असते. सत्ताधारी हे नेहमीच नवनवीन मुद्दे देत असतात. त्यावर आवाज उठवणे आपली जबाबदारी आहे. यासाठी कोणताही मुहूर्त लागत नाही. बेरोजगारी, महागाई अशा सर्व मुद्द्यांवर लोकशाहीच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून त्याविरोधात आवाज उठवा. ”
जयंत पाटील यांनी बैठकीला संबोधित करताना सांगितले की, “मुंबईत आपला पक्ष वाढविण्यासाठी अनेक वर्षांपासून आपण प्रयत्न करतोय. पक्षनिष्ठा ठेवून काम करणारे बोरिवलीपासून कुलाब्यापर्यंत प्रयत्न करत आहेत. राजकारणाच्या दृष्टीने महाराष्ट्रात मुंबई शहर हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण शहरात स्वतंत्र फादर बॉडी तयार केली आहे. आपण अधिक सतर्कपणे प्रत्येक वॉर्डमध्ये पक्षाचा उमेदवार देणे गरजेचे आहे. यासाठी आपल्याला सातत्याने लोकांमध्ये जाऊन संवाद साधला पाहिजे. यासाठी सर्वांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा. याद्वारे पक्षाची भूमिका प्रकर्षाने मांडण्यास मदत होईल.”
मुंबई शहरात पाणी, मीटर, सांडपाण्याचा निचरा असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांकडे आपल्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ते सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे, अशी सूचना छगन भुजबळ यांनी केली. आज गुरुपौर्णिमा आहे. या दिवशी सर्वांनी एकच निर्धार करा आणि शरद पवार यांना गुरूदक्षिणा म्हणून मुंबई शहरात आपल्या नगरसेवकांची संख्या वाढवून दाखवा, असे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
