मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ओबीसी मोर्चा आंदोलनादरम्यान पत्रकारांशी बोलताना काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांना उद्देशून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत होती. समाजाच्या सर्वच स्तरातून त्यांचा वक्तव्याचा निषेध होत होता. यानंतर राज्य महिला आयोगाकडे चंद्रकांत पाटील यांची तक्रारही करण्यात आली होती. सोबतच त्यांच्या माफीनाम्याची जोरदार मागणीही होत होती. यावरूनच आता खुद्द चंद्रकांत पाटलांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहित आपल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
राज्य महिला आयोगाला लिहिलेल्या पत्रात चंद्रकांत पाटील म्हणतात, “आयुष्याची ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात गेल्यानंतर स्वयंसिद्धा, हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप, सावली, आई, संवेदना आणि वात्सल्यसारख्या संस्थांच्या मागे उभे राहून महिला सबलीकरणासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असणारा मी, ज्या पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत १२ महिला आमदार व देशाच्या लोकसभेत महाराष्ट्रातून ५ महिला खासदार आहेत. मला सुप्रियाताईंबद्दल व महिलांबद्दल मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे लागते यासारखे आयुष्यात दुःख नाही. माझ्या ओबीसी बंधू-भगिनींना राजकीय आरक्षण न मिळाल्याने मी त्रासाने केलेल्या उच्चारात सुप्रियाताई किंवा समस्त माता-भगिनींचा अपमान झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो”.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील ?
ओबीसी आरक्षणावरुन राज्यात आरोप प्रत्यारोप सुरु असताना, भाजपने मंत्रालयावर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना वादग्रस्त विधान केले होते. या विधानामुळे बरीच खळबळ माजली होती. चंद्रकांत पाटील म्हणाले होते, “कशाला राजकारणात राहता. घरी जा, स्वयंपाक करा, खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची? कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचं? आता घरी जाण्याची वेळ झालीये. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या”
महत्त्वाच्या बातम्या –


