मुंबई : गेल्या दीड वर्षापासून देशभरात कोरोना ठाण मांडून बसला आहे. त्यामुळे सर्वच प्रकारच्या सण-उत्सवांवर कोरोनाचे सावट असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी सर्वच उत्सव रद्द करावे लागल्यामुळे गणेश मंडळांपासून ते दहीहंडी मंडळांपर्यंत सर्वांचीच निराशा झाली होती. गणेशोत्सव देखील मर्यादित स्वरुपात फक्त घरगुती प्रतिष्ठापनेसाठी परवानगी देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर यंदा कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर दहीहंडीला आणि इतर उत्सवांना काही प्रमाणात परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली जात होती.
मात्र, आता राज्य सरकारने कोरोनामुळे यंदाही दहीहंडीला परवानगी नाकारली आहे. एकदा परवानगी दिली आणि प्रभाव वाढला तर उत्सवाला आणि संस्कृतीला गालबोट लागेल. यावेळी तुमची इच्छा असली तरी सरसकट परवानगी देता येणार नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. परंतू यावरून आता राजकीय वाद सुरू झाला आहे. भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाविरोधात रान पेटवले आहे. ‘तुम्ही कितीही निर्बंध लावा, दहीहंडी होणारच’ असा सूर भाजप नेत्यांनी लावला आहे. कोरोना नियमांचे पालन करून दहीहंडी होणार असा निर्धार केलाय. शिवाय महाविकास आघाडी जाणिवपूर्वक हिंदूंच्या सणांना टार्गेट करत असल्याचा आरोप भाजपकडून होत आहे.
यात कितपत खरे आहे याची कारणीमिंमासा करणे गरजेचे आहे. कारण, भाजपने आतापर्यंत महाविकास आघाडी सरकारला हिंदू विरोधी ठरवण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडी सरकारने महसूलापोटी दारुची दुकाने, मॉल, बाजारपेठा सुरू करून भाजपाला आयते कोलीत दिलेले आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असतानाही धार्मिक स्थळे बंद असल्याने भाजपने राज्य सरकारला धारेवर धरले आहे.
फायदा कशात यावरून राजकारण
एकीकडे ठाकरे सरकार ‘आर्थिक’ कारणांमुळे व्यापारी, उद्योजकांची काळजी घेताना दिसत आहे. तर भाजप सणांना परवानगी द्या, मंदिरे उघडा अशा मागण्या करत हिंदूत्त्वाची काळजी करत आहे. परंतू, या सर्व घडामोडींमध्ये महत्त्वाची गोष्ट बाजूला होत आहे. ती म्हणजे कोरोना. कोरोनाची तिसरी लाट निश्चित येणार असा दावा तज्ज्ञ करत आहेत. परंतू कोणत्याच राजकीय पक्षाला याचे घेणेदेणे राहिलेले नाहीये असे दिसत आहे. केवळ सत्ताधारी राजकीय हितासाठी निर्णय घेत आहेत, तर भाजपासारखा विरोधक आपला फायदा कशात आहे यावरून राजकारण करत आहे.
सत्ताधाऱ्यांना दुषणे देत नियमांना हरताळ फासायचे
भाजपची सध्या सुरू असलेली जन आशीर्वाद यात्रेत कोरोनाचे नियम कितपत पाळले जात आहेत यावर संशोधन होणे गरजेचे आहे. कार्यकर्ते दूर पण नेतेमंडळी आणि खुद्द केंद्रीय मंत्री देखील मास्क वापरत नाहीयेत. सोशल डिस्टन्सिंगचा प्रकार तर नावाला देखील नाही. राज्य सरकार मात्र, यात्रेच्या आयोजनावरून लुटपूट गुन्हे दाखल करत आहे. देशात सत्ताधारी असलेल्या भाजपाला कोरोनाची कितपत चिंता आहे, हे यावरून दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढला म्हणून सत्ताधाऱ्यांना दुषणे द्यायचे आणि स्वत: मात्र नियमांना हरताळ फासायचे असा प्रकार फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात सुरू आहे.
दहिहंडीच्या निमित्ताने नेत्यांचे खालच्या थराला जाऊन राजकारण
या सर्वांमध्ये आता भाजपाला दहीहंडीचा मुद्दा सापडला आहे. गणेशोत्सव दारात येऊन ठेपला आहे. मग दसरा, दिवाळी. या धार्मिक मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि भाजप एकमेकांवर चिखलफेक करणार. मात्र, यात भरडला जाणार फक्त सामान्य नागरिक. कारण, कोरोनाचा संसर्ग वाढल्यास सामान्यांना रुग्णालयात उपचारासाठी बेड देखील मिळत नाही, हे सर्वांनी पाहिले आहे. त्यावर उपाययोजना, आरोग्य सुविधा मजबूत करण्यापेक्षा नेतेमंडळी खालच्या थराला जाऊन राजकारण करत आहेत हे महाराष्ट्राचे दुर्देव आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- तालिबानवर विश्वासासंबंधी बायडेन यांचे खोचक वक्तव्य, म्हणाले..
- भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी ; हि गर्दी टाळली पाहिजे- आरोग्यमंत्री
- गुन्हे मागे ; बैलगाडा मालकांनी जल्लोषात केला गृहमंत्री वळसे पाटलांचा सत्कार
- मोठी बातमी : मंत्रालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी सुभाष जाधव यांचा मृत्यू
- शहरात लसीकरणाला प्रतिसाद ; पावणे सात लाख जणांचे लसीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

