मुंबई : महाराष्ट्रासह देशात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तसेच, येत्या काळात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील स्थिती पाहता आता केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. रेमडेसीवीर इंजेक्शनची मागणी वाढली असून साठेबाजी करून चढ्या दराने हे इंजेक्शन विकण्याचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. राज्यात रुग्णांसाठी रेमडेसीवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठ्या रांगेत उभे राहून अधिक दराने हे इंजेक्शन विकत घ्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने रेमडेसीवीरची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशातील रुग्णांना आता वेळेत व योग्य दरात रेमडेसीवीर इंजेक्शन मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमधून केंद्र सरकावर टीकास्त्र डागले जात आहे. कॉंग्रेसचे नेते भाई जगताप यांनी ट्वीट करून मोदी सरकारवर टीका केली आहे. ‘कोरोना येऊन एक वर्ष झालं..मोदी सरकारला अजून रेमडेसिव्हर इंजेक्शन मुबलक प्रमाणात देता आलेलं नाही..!!आणि यांना ७० वर्षांचा हिशेब हवे म्हणे..!!’ अशा आशयाचे ट्वीट करून त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागले आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने रेमडेसीवीरची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे राजेश टोपे यांनी स्वागत केलं असून, ‘आम्ही ही मागणी आधीच केली होती. मात्र देर आये दुरुस्त आये ! केंद्राच्या या निर्णयाचे स्वागत,’ असा टोला देखील लगावला होता.
महत्वाच्या बातम्या
- मराठवाड्यात विजेच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
- ई-कॉमर्स व्यापारासह सरसकट लॉकडाऊन करा, अन्यथा…पुण्यातील व्यापाऱ्यांचा प्रशासनाला इशारा
- भाजपच्या माजी आमदाराचे कोरोनामुळे निधन, नानावटी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
- देशात लॉकडाऊन करताना मोदींनी कुणालाही विचारात घेतले नव्हते – नवाब मलिक
- मोठी बातमी : दहावी बारावीच्या परीक्षा ढकलल्या पुढे


