औरंगाबाद : कोरोनाच्या काळात गेले अनेक महिने बंद असलेली एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. रुग्ण संख्या कमी होत असल्याने प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र कोरोनाच्या संकटातही प्रवाशांना सेवा देणाऱ्या चालक-वाहकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. प्रत्येक महिन्याला पगार देण्यात प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक ओढाताण होत आहे.
लॉकडाउनच्या काळात राज्य शासनाने निधी दिला होता. त्यातून कामगारांचे पगार करण्यात आले. दुसऱ्या लॉकडाऊनमध्येही शासनाने महामंडळाला निधी उपलब्ध करून दिला. यातून कर्मचाऱ्यांचे पगार होत राहिले. दोन महिन्यांपूर्वी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे एसटी बस सेवा आता पूर्ववत राज्यभर सुरू झाली आहे. सुरुवातीला कमी असणारी प्रवाशांची संख्याही आता रुग्ण संख्या कमी झाल्याने वाढली आहे.
मात्र डिझेलचे दर वाढले आहे. एसटीला याचा तोटा सहन करावा लागत आहे. औरंगाबाद विभागाला दररोज साधारण ३५ ते ४० लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. प्रति किलोमीटर सत्तावीस रुपये उत्पन्न आहे. यातून २२ ते २३ रुपये डिझेल वर खर्च होत असून उरलेल्या पैशातून एसटीच्या देखभालीवर खर्च करावा लागत असल्याने कर्मचाऱ्यांचा पगार करण्यासाठी पैसेच शिल्लक राहत नसल्याची एकंदरीत परिस्थिती आहे.
डिझेलच्या वाढलेल्या किमतीमुळे २८ रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे जुलै महिन्याचा पगार अजूनही झालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. एसटी कर्मचाऱ्यांवर कुटुंबीयांची जबाबदारी आहेच शिवाय घेतलेल्या कर्जाचे हप्ते, मुलांचे शिक्षण, आजारपण यासारख्या गरजा पूर्ण करतानाही त्यांची दमछाक होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘हा फक्त माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न नसून करोडो लोकांना गप्प करण्याचा प्रयत्न’
- चिक्की घोटाळ्याबाबत न्यायालयाने खडसावल्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले
- स्वातंत्र्य दिनाच्या पर्वाला राज्यपाल कोश्यारी दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर
- सरकारने थापा मारणे बंद करावे; सायरस पूनावाला यांच्या मोदी सरकारला कानपिचक्या
- १२ आमदारांचा वाद; ‘राज्यपाल उत्तर देण्यास बांधिल नाहीत, त्यांना आम्हीही निर्देश देऊ शकत नाही’, हायकोर्टाचे स्पष्टीकरण


