अहमदनगर : राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ही ओसरली असून बहुतांश निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली. अशातच काही महत्त्वाचे सण काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. बहुतेक सर्व सुरु झाले असताना सर्वधर्मीय प्रर्थनास्थळे अद्यापही बंदच असल्याने मोठ्याप्रमाणावर नाराजी वाढत आहे. भाजपची आध्यात्मिक आघाडी मंदिरे सुरु करण्याची मागणी सातत्याने करताना दिसून येत आहे. भाजपकडून आज राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे.
नगर जिल्ह्यात श्रीक्षेत्र कोल्हार येथील भगवती माता मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या शंखनाद आंदोलनात भाजप नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे सहभागी झाले होते. या आंदोलनानंतर विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. तर, ‘मुख्यमंत्री स्वतः घरात बसले अन् देवांनाही डांबून ठेवले’, असा चिमटा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना काढला आहे.
‘अनेकदा आंदोलने करूनही जर महाविकास आघाडीचे सरकार मंदिरे उघडण्याचा निर्णय घेत नसेल तर आम्हाला यासाठी न्यायालयात जावे लागेल. मुख्यमंत्री स्वतः घरात बसले अन् देवांनाही डांबून ठेवले. अजून किती दिवस कायद्याचा धाक दाखवून तुम्ही भाविकांना वेठीस धरणार?’ असा सवाल विखे यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले, ‘भाविक, वारकरी आणि अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींच्या भावनांशी तुम्ही खेळू नका, यापूर्वी पंढरपूरच्या वारीवर बंधन घालून तुम्ही वारक-यांचा अपमान केलेलाच आहे आता अधिक अंत पाहू नका अन्यथा या भावनांचा उद्रेक होईल. राज्यात एकीकडे दारूची दुकानं सरकारने सुरु केली. लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींना तुम्ही मॉलमध्ये परवानगी दिली, मुंबई मधील लोकलही सुरु केल्या मग मंदिरांबाबतच येवढी उदासिनता का?’
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या ५ संस्थावर ईडीची धाड
- उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या टीमकडून लूटमार सुरू-किरीट सोमय्या
- ‘गेल्या चार-पाच वर्षांपासून आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचे कारस्थान सुरू’, राष्ट्रवादीचा आरोप
- ‘बिरोबाच्या खोट्या शपथा घेतल्या तर त्याचं पार वाटोळं होतं’, जयंत पाटलांचा पडळकरांना टोला
- ‘योग्य वेळी सीडी लावणार, सध्या ती पोलिसांकडे’, खडसेंचा इशारा


