मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्यावर्षी पासून राज्यासह देशभरात कोरोना रोगाने माजवलेल्या हाहाकारामुळे शैक्षणिक क्षेत्रका देखील मोठा फटका बसला आहे.
दरम्यान, दरवर्षी मार्च-एप्रिल मध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या राज्य बोर्डाच्या परीक्षा एप्रिल-मे मध्ये घेण्याचे बोर्डाने जाहीर केले होते. मात्र, कोरोनाच्या थैमानामुळे दहावीच्या परीक्षा रद्द तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले होते. यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेशाबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. तर, बारावीच्या परीक्षांच्या नियोजनाबाबत देखील अनिश्चितता आहे.
अशातच, दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्यात कार्यरत असलेल्या विविध बोर्डांमध्ये एकवाक्यता नाही, राज्य सरकारही परिक्षांच्या बाबतीत गोंधळलेली आहे. आधी परीक्षा घेण्यावर ठाम होते, मग ऐनवेळी परिक्षा रद्द केल्या. त्यातही दहावी बोर्डाच्या परिक्षा रद्द केल्या मात्र बारावी बोर्डाच्या परीक्षा घेणार असं जाहीर केलंय. तर अकरावीच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अंतर्गत गुणांवर ठरवणार आहेत. तर मग हे सारं करताना दहावीच्या परिक्षा रद्द करून सरकारनं काय साध्य केलं? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
यासोबतच, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर याचा काय परिणाम होईल याचा विचार हा निर्णय घेताना केलेलाच नाही असा आरोपही या याचिकेतून करण्यात आला आहे. त्यामुळे दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला तात्काळ स्थगिती देऊन या परिक्षा घेण्यात याव्यात अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. पुण्यातील एका नागरिकाने दाखल केलेल्या या याचिकेवर गुरूवारी सुनावणी घेण्यास हायकोर्टानं नकार दिल्याने पुढील आठवड्यात दुस-या खंडपीठापुढे यावर सुनावणी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तुमचा एक फोन कॉल लहानग्यांसाठी मदतीचा हात ठरू शकतो’, कोरोनात अनाथ झालेल्यांसाठी पार्थ पवार सरसावले
- कोरोनामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास ‘बजाज’ देणार कुटुंबियांना दोन वर्षांचा पगार ! इतकंच नाही तर…
- ‘फक्त जनतेला दाखवण्याकरता लसींच्या ग्लोबल टेंडरचा फक्त फार्स सुरू आहे ?’
- कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मिळणार ५ हजारांची पेन्शन,शिक्षणही मिळणार मोफत
- अनिल परबांच्या ‘त्या’ रिसॉर्टच्या चौकशीसाठी थेट दिल्लीहून पथक येणार !


