मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात वारंवार शाब्दिक युद्ध पाहायला मिळत आहे. १२ आमदारांच्या नियुक्तीचा वाद असो की प्रशासकीय दौरा, राज्य सरकार राज्यपालांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. तर राज्यपाल कोश्यारी हे देखील विविध मुद्द्यांवरून ठाकरे सरकारला कोंडीत पकडतात. यामुळे राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात वाद निर्माण होत आहेत.
मात्र, सतत राज्यपालांवर टीका करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज चक्क त्यांचे कौतूक केले आहे. ‘राज्यपालांनी स्वत:ला राजकीय प्यादं म्हणून वापरायला देऊ नये. ते पूर्वाश्रमीचे भाजपाचे नेते किंवा संघाचे प्रचारक असू शकतात. त्यावर आमची काही भूमिका किंवा आक्षेप असण्याचं कारण नाही. पण घटनेनुसार राज्यांच्या अधिकारांवर, कॅबिनेटच्या अधिकारांवर अतिक्रमण करत असतील तर हे या देशाच्या संघराज्यावर हल्ला आहे. असे विधान संजय राऊत यांनी केले आहे.
त्याचबरोबर ‘हे राज्यपाल प्रेमळ, सद्वर्तनी, मनमिळावू आहेत. पण १२ आमदारांच्या संदर्भातील त्यांची भूमिका राजकीय आहे. हे त्यांनाही माहीत आहे. मी त्यांना ओळखतो. मी त्यांच्यासोबत काम केलंय. ते मनापासून हे करत नसावेत. त्यांची नेमणूक ज्या पक्षाकडून झालीय, ते त्या पक्षाच्या भूमिकेला किंवा दबावाला अनुसरून काम करताहेत. त्यांनी दबाव झुगारून स्वाभिमानी बाणा दाखवावा. घटनेचे रखवालदार असल्याचं दाखवून द्यावं,’ अशा शब्दांत राऊत यांनी कौतूक केले आहे.
राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्त करावयाच्या १२ सदस्यांच्या नियुक्तीची घोषणा राज्यपाल कोश्यारी यांनी अनेक महिने उलटूनही केलेली नाही. त्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर काल सुनावणी झाली. राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय घेण्यास अवाजवी विलंब लावला आहे, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. त्यानंतर राऊत यांनी आज न्यायालयाच्या निकालावर भाष्य केले.
महत्त्वाच्या बातम्या
- बंदी असतानाही गोपीचंद पडळकरांकडून २० ऑगस्टला बैलगाडा-छकडा शर्यतीचे आयोजन
- ‘महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळांविरोधात आमच्याकडे पुरावे, त्यांना दोषमुक्तता नको’, एसीबीचा कोर्टात दावा
- भाजप नेते प्रवीण दरेकरांची मुख्यमंत्र्यांशी बंद दाराआड चर्चा, राजकीय चर्चांना उधाण
- संसदीय मर्यादाभंग! खासदार बेफाम का होतात, याची कारणे अष्टप्रधानांनी शोधावी- संजय राऊत
- मुंबई महापालिकेचा गणेशोत्सव मंडळांना दिलासा !


