मावळ : ‘या मावळातून मावळून तू कधीचं गेला रं… माझ्या राजा रं… माझ्या शिवबा रं’ अशीच दुःखी भावना सद्या प्रत्येक गडप्रेमी आणि शिवभक्तांची आहे. गेले शेकडो वर्ष इतिहासाची साक्ष देत कणखरपणे उभे असलेले गडकिल्लेच महाराष्ट्राचे खरे वैभव आहेत. सर्व किल्ल्यांना ऐतिहासिक महत्वासोबतच नैसर्गिक सौंदर्य देखील लाभले आहे.
आधीच गेली अनेक दशके सरकारकडून दुर्लक्षित राहिल्याने हे गड-किल्ले सद्या अखेरचे घटका मोजत आहेत. पण गेल्या काही वर्षात गडप्रेमी व शिवभक्तांनी मिळून पुढच्या पिढीला आपला ज्वलंत इतिहास समजावा यासाठी गडसंवर्धनाचे शिवधनुष्य हाती घेतले आहे. अनेक दुर्गम किल्ल्यांची डागडुजी, ऐतिहासिक अवशेषांचे संवर्धन करून किमान आता पर्यंत तग धरून असलेल्या वस्तूंचे संरक्षण व्हावे या भावनेतून हे गडप्रेमी प्रसिद्धी न घेता आपापले काम करत असतात.
घाटमाथ्याची देखरेख करण्यासाठी महत्वाचा मानल्या जाणाऱ्या किल्ले तिकोनावर सह्याद्री प्रतिष्ठाणने दोन वर्षांपूर्वी बालेकिल्ला प्रवेशद्वारावर दरवाजा बसवला होता. या दारवाज्याला खास ऐतिहासिक रुपात बनवण्यात आल्याने किल्ल्याच्या रुपात भर पडत होती. मात्र, काही समाजकंटक पर्यटकांनी या दरवाजाची नासधूस केल्याचे आता समोर येत आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक गडकिल्ल्यांनी पावन असलेल्या मावळात वर्षा पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे.
त्यामुळेच या गडाचा दरवाजा हौशी पर्यटकांना आवर घालण्यासाठी शासन निर्णयाप्रमाणे बंद ठेवण्यात आला. रविवारी (दि. ४ ऑक्टोबर) रोजी पहाटे काही अतिउत्साही पर्यटकांनी या गडाच्या दरवाजाचे नुकसान करून किल्ल्यावर प्रवेश केल्याचे समजत आहे. त्यामुळे आता शिवभक्त व गडप्रेमी संताप व्यक्त करत असून पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेले दुर्गम किल्ले टिकवण्यासाठी नागरिकांनी समाज उपयोगी उपक्रम राबवण्याची गरज असताना काही समाजकंटकांच्या अशा कृत्यामुळे पर्यटनावर काळीमा फासला गेला आहे. श्रमदानातून बसविण्यात आलेल्या या दरवाजाची नासधूस होण्याची ही दुसरी वेळ असल्याने बजरंग दल व सह्याद्री प्रतिष्ठाणने लोणावळा ग्रामीण उपनिरीक्षक निरंजन रनवरे यांच्याकडे निवेदन देखील दिले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- मराठी चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक ‘गन्स ऑफ नॉर्थ’ लवकरच पेक्षकांच्य भेटीला
- अनंत करमुसे मारहाण प्रकरणातील मुख्य सूत्रधार गजाआड होणार का?
- कोरोना बाधीत मनपा शिक्षकांसाठी बेड आरक्षीत ठेवा : महापौर
- अनंत करमुसे मारहाण प्रकरणात सहा महिने उलटल्यानंतर अखेर तीन पोलिसांना अटक
- एका नटीस वाय प्लस सुरक्षा, पण हाथरस पीडित कुटुंब ‘भगवान भरोसे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

